Join us

पाणीटंचाई दूर करण्यासाठी सात जलकुंभ

By admin | Updated: March 7, 2015 22:33 IST

रस्त्याच्या कामांखेरीज महापालिकेची अनेक विकासकामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. त्यांचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी घेतला.

डोंबिवली : रस्त्याच्या कामांखेरीज महापालिकेची अनेक विकासकामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. त्यांचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी घेतला. कल्याण पूर्व आणि पश्चिमेच्या काही भागांत पाणीटंचाई असल्याने त्या भागातील सात जलकुंभ येत्या १० दिवसांत कार्यान्वित करण्याचे आदेशही दिले. तसेच मोहने येथील उदंचन केंद्राची उंची वाढवण्याबाबत लवकरच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासमेवत बैठक घेण्याचेही त्यांनी निश्चित केले. मलनिसारण प्रकल्पाची कामेही तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून आजवर रखडलेल्या कामाबद्दल कंत्राटदार गॅमन इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले़बीएसयूपीअंतर्गत ज्या ठिकाणी लाभार्थींची यादी परिपूर्ण आहे, अशा घरांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करून अन्य अडचणींबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असून आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी शहरातील नामांकित डॉक्टरांचे सहकार्य घेण्यासंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्याची सूचनाही त्यांनी केली. कल्याण व डोंबिवली रिंग रोड प्रकल्पबाधितांच्या मोजणीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. (प्रतिनिधी)अन्यथा महापालिकेच्या वकीलांचे नवे पॅनल महापालिकेच्या अनेक विकास योजनांबाबत न्यायालयात खटले सुरू आहेत. या खटल्यांमध्ये पालिकेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी गरज पडल्यास सक्षम वकिलांचे नवे पॅनेल तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आर्ट गॅलरी, ट्रक टर्मिनस, बॅडमिंटन कोर्ट आदी बीओटी तत्त्वावरील रखडलेल्या प्रकल्पांसमोरील अडचणी दूर करण्यासाठीही वेगाने पावले उचलण्यात येणार असून शासन स्तरावरील बाबींचे निराकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली़