पंकज पाटील ल्ल अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेत ५० पैकी भाजपाचा एक नगरसेवक आहे, मात्र मोदी लाटेवर स्वार होण्यास इच्छूक असलेले येथील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. शिवसेनेनेही स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. युतीतील दोन्ही घटकपक्ष आगामी पालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणे निश्चित मानले जात आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातही आघाडीबाबत एकवाक्यता दिसत नसल्याने सर्व प्रमुख पक्ष स्वबळाच्या वाटेवर असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये दिसत आहे. नगरपरिषदेत एकून ५० नगरसेवक असून त्यातील सत्ताधारी शिवसेनेचे १६, भाजपा १, अपक्ष ७, मनसेचे ६, राष्ट्रवादीचे ९ आणि काँग्रेस व रिपाइं आघाडीचे ११ सदस्य आहेत. सर्वात कमजोर पक्ष म्हणून भाजपा असतांनाही यंदाच्या निवडणुकीत त्या पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने मतांच्या या आघाडीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. तर समान जागा वाटपावर शिवसेना एकमत न झाल्याने शिवसेनेही शहरात आपली ताकद पुन्हा दाखविण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. ऐनवेळेवर शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे गेल्या निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी आणि रिपाइं यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नव्हते. यंदा या तिन्ही पक्षात आघाडीबाबत एकवाक्यता होतांना दिसत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे कोणतीही चर्चा न करताच एकमेकांविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. तर रिपाइं आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत एकवाक्यता होण्याचे संकेत दिसत आहेत. (प्रतिनिधी)
सेना-भाजपात स्वबळाचे वारे
By admin | Updated: March 4, 2015 02:06 IST