नवी मुंबई : पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या दोन मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मडगाव व गुजरात येथून ही दोन्ही मुले ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. त्यापैकी एका मुलाने सायकल चोरल्याच्या शरमेने घरातून पळ काढला होता.पाच वर्षांपूर्वी या दोघांच्या हरवण्याची तक्रार कळंबोली व एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, साहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर, गोरक्षनाथ पवार, राजेंद्र भांडारकर, किशोर घुगे, जगदीश पाटील यांच्या पथकाने त्यांचा शोध घेतला आहे. कामोठे येथून पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तेरा वर्षांचा मुलगा गुजरातमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानुसार पथकाने तेथील एका कारखान्यातून त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. तर पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील दिवाळे गाव येथून हरवलेल्या चार वर्षांच्या मुलाला मडगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)
हरवलेल्या दोन मुलांचा शोध
By admin | Updated: January 21, 2016 03:01 IST