Join us  

समुद्राने गिळली महामुंबईची १०७ चौ. कि.मी. जमीन; ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 7:45 AM

उपग्रहाच्या अभ्यासातून स्पष्ट : ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढ

सचिन लुंगसेमुंबई : विविध कारणांनी नैसर्गिक जलप्रवाह बुजविल्याने, त्यात अडथळे आणल्याने, तसेच गेल्या ३० वर्षांत समुद्राच्या वाढत गेलेल्या पाणी पातळीने मुंबई महानगर परिसरातील १०७.६ चौरस किलोमीटर क्षेत्र नैसर्गिकरीत्या लुप्त झाल्याचा अहवाल समोर आला आहे. सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलांमुळे लुप्त झालेले हे क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा थोडे अधिक आहे. त्याचे रूपांतर गाळयुक्त दलदल, कांदळवनात (खारफुटीत) झाले, असे सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्राथमिक अहवालातून पुढे आले. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील किनाऱ्यालगतच्या अनेक मोठ्या रहिवासी सोसायट्या पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे. विशेषत: पावसाळ्यात हे संकट गहिरे होऊ शकते.

समुद्रकिनारे आत येत असल्याने किनारपट्टीवरील लाखो लोकांची उपजीविका धाेक्यात येऊ शकते, तसेच जमीन नापीक झाल्याचा फटकाही बसू शकतो. मुंबई महानगर क्षेत्राच्या किनाऱ्यालगत वाढत असलेल्या पाणी पातळीचे चिंताजनक परिणाम उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासातून समोर आले आहेत. 

खाड्यांकडे लक्ष देणे गरजेचे

आक्रसत चाललेल्या खाड्या हे शहरासाठी चांगले लक्षण नाही. यामुळे मुंबईत पावसाळ्यात पुरानंतर नाल्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय घट होऊ शकते, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. परिणामत: मोठ्या प्रमाणात पाऊस असताना आणि त्याचवेळी भरती आली तर हे समुद्राचे पाणी शहरामध्ये सर्व भागांमध्ये पसरते. - डॉ. दीपक आपटे, कार्यकारी संचालक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन

टॅग्स :सागरी महामार्गमुंबई