पारोळ : वसई परिसरात तसेच ग्रामीण भागात साप चावण्याच्या घटनांत वाढ होत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोजतीन ते चार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ग्रामीण भागातील पाटोळ, भाताणे प्राथमिक केंद्रात साप चावल्यावरचे औषध उपलब्ध असल्यामुळे सर्पदंशामुळे रुग्ण दगावण्याची घटना घडलेली नाही.वसई परिसरात नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, हरणटोळ, दिवर, धुळनागीण, वाला, अजगर, कवड्या, रुकासर्प या प्रकारच्या जातीचे विषारी व बिनविषारी साप आढळतात. पण काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पुरात हे शेता-बांधामधील साप घरात तसेच मानवी वस्तीत घुसल्यामुळे साप चावण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या सापांमध्ये घोणस, मण्यार, फुरसे या अत्यंत विषारी सापांचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या रुग्णांना काही मिनिटांत उपचार करणे जरुरीचे आहे. मण्यार या सापाचे विष धोकादायक असून तो चावल्यास १५ ते २० मिनिटांत रुग्णावर औषधोपचार करावा लागतो. (वार्ताहर)
वसई परिसरात सर्पदंश रुग्णांत वाढ
By admin | Updated: August 14, 2014 00:50 IST