ठाणे : गेल्या काही वर्षात राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. विविध घोटाळ्यांचे आकडे बघून तर धक्काच बसतो. इतके मोठे घोटाळे होऊ शकतात, यावर विश्वासच नाही बसत. या घोटाळ्यांवर आपण हसावे की रडावे हेच कळत नसल्याची खंत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.अभिनय कट्टयावर अनासपुरे यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ या त्यांच्या नवीन चित्रपटावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणाविषयी आपले मत व्यक्त केले. कलावंत हा समाजाचा आरसा असतो. कलावंतांकडे निकोप दृष्टी, निरीक्षणशक्ती चांगली असावी. राजकीय आणि सामाजिक भानही चांगले असावे असेही त्यांनी व्यक्त केले. तर साऊथच्या तुलनेत मराठी चित्रपटाचे रसिक हे चोखंदळपणे चित्रपट पाहतात. त्यामुळे साऊथच्या चित्रपटांमध्ये तांत्रिक बाबी उत्तम असल्या तरी मराठी चित्रपटांचा दर्जा चांगला असतो, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. परिसंवादातून ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ या चित्रपटाचा प्रवास प्रेक्षकांसमोर थोडक्यात उलगडला. (प्रतिनिधी)
घोटाळ्यांचे आकडे पाहून धक्काच बसतो
By admin | Updated: October 12, 2014 23:49 IST