Join us  

'...तर यांनी नियमांची मोडतोड करुन देशाची वाट लावू नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 8:12 AM

तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये

मुंबई - हिंदुस्थानात अद्यापि तालिबानी राजवट सुरू झालेली नाही व मोकळय़ा वातावरणात जगण्याचा हक्क एखाद्या फतव्याने मारला जाणार नाही. नुसरत जहाँच्या कपाळावरील कुंकू ही देशाची संस्कृती आहे व गळय़ातील मंगळसूत्र हे आयुष्यभराचे संस्कार व सुरक्षेची कवचकुंडले आहेत. तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून हाणला आहे. 

त्याचसोबत ‘वंदे मातरम्’ची माती कपाळास लावून प्रत्येकाला आपला धर्म आणि श्रद्धा जपण्याचा हक्क आहे व तो राहावा. देशातील हिंदू व मुसलमान यांनी या नियमाची मोडतोड करून देशाचे वाटोळे करू नये असा सल्लाही धर्मांधांना देण्यात आला आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे  

  • मुसलमान समाजातील काही मंडळींची डोकी म्हणजे रिकामी मडकीच आहेत. देश, समाज कितीही पुढे गेला तरी यांची मानेवरील मडकी तेच बुरसटलेले विषय घेऊन फिरत असतात. 
  • प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तरुण खासदार नुसरत जहाँ यांनी एका हिंदू उद्योगपतीशी लग्न केले. त्यांचे लग्न संपूर्ण हिंदू रीतिरिवाजानुसार झाले. हा त्या पती-पत्नीचा वैयक्तिक निर्णय होता. 
  • विवाहानंतर नववधू नुसरत संसदेत आली. हातास मेहंदी, गळय़ात पल्लेदार मंगळसूत्र, कपाळावर चमकदार ‘कुंकू’ म्हणजे लाल बिंदी. नुसरतच्या या बदलत्या रूपावर कुण्या एका दारूल उलूम देवबंदने म्हणे फतवा काढला. 
  • मुस्लिमांनी केवळ मुस्लिम धर्मीयांशीच विवाह करावा. खासदार नुसरत जहाँचा हा पेहराव सध्या सगळय़ांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे, पण काही मुस्लिम धर्मांध संघटनांच्या हनुवटीवरील दाढी मात्र जळू लागली आहे. 
  • मुसलमानांच्या भूतकाळातील अनेक पिढय़ा या फतवेवाल्यांनी बरबाद केल्या. धर्मांधतेच्या चिखलातून बाहेर पडून त्यांना कधी मोकळा श्वास घेऊ दिला नाही. शहाबानो प्रकरणातही धर्मांधांनी दबावाचे राजकारण केले व राजीव गांधींच्या काँग्रेसने त्या दबावापुढे शरणागती पत्करली. 
  • आज प. बंगालातही ममता बॅनर्जी यांनी तेच दाढय़ा कुरवाळण्याचे राजकारण सुरू करताच प्रखर राष्ट्रवादाची वाफ झाकण उडवून बाहेर आली. नुसरत जहाँ त्याच बंगालच्या कन्या आहेत. त्यांच्या भावनांचा सन्मान व्हायला हवा. 
  • नुसरत यांनी त्यांच्या इच्छेनुसार लग्न केले. यात धर्मद्रोह असा काय घडला? ‘‘मुस्लिम मुलीने जर हिंदू मुलासोबत लग्न करून मंगळसूत्र घातले आणि कुंकू वा टिकली लावली तर त्यास ‘हराम’ म्हटले जाते. मग ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू मुलीसोबत लग्न करून तिला बुरख्यात ठेवले तर ते ‘हराम’ नाही काय?’’ असा प्रश्न भाजपच्या साध्वी प्राची यांनी विचारला तो योग्यच आहे. 
  • लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी हा एक सोहळाच असतो. संसदेत धार्मिक घोषणा देऊ नयेत, पण यावेळी ‘जय श्रीराम’बरोबर ‘अल्ला हो अकबर’चे नारेही लागले. अनेक मुसलमान खासदारांनी ‘वंदे मातरम्’चा नारा दिला नाही. ‘वंदे मातरम्’ म्हणणे हे इस्लामच्या विरोधात असल्याचे या लोकांनी सांगितले, पण नुसरत जहाँने मात्र खासदारकीची शपथ घेताच ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. 
  • मुसलमान समाजातील नवपिढीतला हा बदल आहे. धर्माचे फालतू राजकारण संपवायला हवे व मुसलमानांच्या नव्या पिढीने या धर्मांधतेविरोधी आवाज उठवायला हवा. नुसरत जहाँने वेगळे काहीच केले नाही. नुसरत मुसलमान म्हणून जन्माला आली यात तिचा काय दोष? 
  • ती शेवटच्या श्वासापर्यंत मुसलमान राहील, तिची श्रद्धा जपून ठेवील, पण एक कडवट हिंदुस्थानी नागरिक म्हणून ‘वंदे मातरम्’चा नारा देत मातृभूमीपुढे झुकणे हा तिचा निर्णय आहे. देशाच्या भूमीवर मस्तक टेकवू नका असे कोणत्या इस्लामने सांगितले? 
  • लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला मातोंडकरच्या बाबतीत काही ‘पचक्या’ धर्मवीरांनी हाच मुद्दा काढला. ऊर्मिलाने म्हणे एका मुसलमान तरुणाशी लग्न केले व या ‘पचक्यां’ना ऊर्मिलाने सडेतोड उत्तर दिले.  
टॅग्स :शिवसेनालोकसभाहिंदूमुस्लीमखासदार