पंकज पाटील, बदलापूरवटपौर्णिमा वगळता फणस या फळाला बाजारपेठेत विशेष अशी मागणी नसते. त्यामुळेच की काय, अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातील देशमुख कृषी पर्यटन उद्यानात वटपौर्णिमेसाठी तब्बल पाच हजार किलो फणसांची विक्री झाली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील बाजारपेठेत देशमुख उद्यानातील फणसाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कारावचे शेतकरी गणपतराव देशमुख यांनी १९४० साली उल्हास नदीला लागून असलेल्या आपल्या शेतात फणसाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सोबत आंबा, जांभूळ, काजू, चिकू, लिंबू आणि पपई यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. ही बाग आणखी फुलवण्यासाठी त्यांनी आपल्या शेताला लागून असलेल्या इतर शेतकऱ्यांची जागा विकत घेतली. नदीपात्राला लागून ४० एकरांचे उद्यान त्यांनी उभारले. वृक्षांची लागवड करण्याचा त्यांचा हा छंद त्यांची मुले दिलीप, चंद्रकांत, रमेश, विलास देशमुख यांनाही होता. बाबांची आवड पुढे जोपासत या चारही मुलांनी आपल्या बागेला कृषी पर्यटन केंद्राचे स्वरूप देऊन पर्यटकांना आकर्षित केले. सोबत, फळे आणि शेतमालाच्या विक्रीतून त्यांनी आपली आर्थिक बाजू भक्कम केली आहे. देशमुख उद्यानात फणसाच्या झाडांची संख्या ५५० हून अधिक आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात फणसांची बाग जोपासणारे देशमुख हे एकमेव शेतकरी आहेत. मात्र, फणसाला वटपौर्णिमा वगळता इतर दिवशी खास महत्त्व देण्यात येत नसल्याने या फळाची विक्री करणे त्यांना अवघड जाते. मात्र, वटपौर्णिमेच्या आठवडाभर आधी अनेक व्यापारी या देशमुख उद्यानातूनच फणसांची खरेदी करून बाजारात विक्री करतात. रायगड, ठाणे आणि मुंबईच्या बाजारांत देशमुख उद्यानातील फणसांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
वटपौर्णिमेसाठी पाच हजार किलो फणसांची विक्री
By admin | Updated: June 12, 2014 01:49 IST