अनिकेत घमंडी, डोंबिवलीमनसेच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधील त्या पक्षाचे उमेदवार रमेश पाटील यांना सपशेल नाकारून शिवसेनेचे सुभाष भोईर यांना एकहाती निवडून देऊन कल्याण ग्रामीणमध्ये भगवा फडकवला. भोईर यांनी तब्बल ८४ हजार ७४ मते मिळवून ४१ हजार १८६ मतांनी आघाडी घेऊन कल्याण ग्रामीणवर वर्चस्व सिद्ध केले.मनसेच्या रमेश पाटील यांना ३९ हजार ८८८, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंडार पाटील यांना १९ हजार ७५०, काँग्र्रेसच्या शारदा पाटील यांना ९,२०८ एवढी मते मिळाली. या आकडेवारीवरूनच भोईर यांना मतदारांनी एकहाती निवडून दिल्याचे स्पष्ट होत आहे. झंझावाती प्रचार करून शिवसेनेचे सीट निश्चित असल्याचा विश्वास भोईर यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केला होता.पक्षांतर्गत बंडाळी होऊ नये, यासाठीही भोईर यांच्यासह जिल्हा संपर्क नेते एकनाथ शिंदे यांनी दिवसरात्र एक करून नाराजी दूर केली होती. त्यामुळेच हा विजय सहज शक्य झाला असल्याची स्पष्टोक्ती शिवसैनिकांनी दिली. वंडार पाटील यांनाही विजयाची खात्री होती. मात्र, बेरजेच्या राजकारणात त्यांचा कस लागला नाही़ परंतु, तरीही त्यांनी वीसहजारी मते मिळाल्याने विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये भगवा फडकला
By admin | Updated: October 20, 2014 03:54 IST