कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात गवत पावळी विक्री अभावी आर्थिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाची दिवाळी मंदित आहे. मजूर वर्गालाही हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात ऐन दिवाळीसणातही शांतता असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच कासा, चारोटी आदी बाजारपेठेतही दोन दिवसापासून खरेदीसाठी गर्दीच नव्हती.तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुर गवत, पावळी विकून दरवर्षी दिवाळीची खरेदी करत असत. तसेच मजूरवर्गही आपली छोटीमोठी शेतीची कामे पूर्ण करून दिवाळी आधी शहराकडे कामधंद्यावर जात असे. दिवाळी आधी थोडीफार कमाई करून मुलाबाळांना कपडे, खरेदी करत असे. मात्र चालूवर्षी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या भातकापण्या सुरू आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसानंतर मळणी करून पावळी विक्रीसाठी तयार होतील. तसेच भातकापणीनंतर शेतकरी गवत कापणीस सुरूवात करतात. त्यामुळे गवतही विक्रीस तयार झालेले नाही. परिणामी शेतीतून उत्पन्नच न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणीमुळे अंधारात जाणार आहे.मजुरांनाही हाताला वेळेवर काम मिळाले नसल्याने दिवाळी सणासाठी कामासाठी आपल्या ठेकेदाराकडून व मालकाकडून उसने पैसे आणून दिवाळी खरेदी करावी लागत आहे. एकंदरीत उशीरा पावसामुळे शेतीची सर्वच कामे उशीराने झाल्याने त्याचा फटका शेतकरीवर्गाला बसला आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागात दिवाळी अंधारात
By admin | Updated: October 23, 2014 23:49 IST