Join us  

अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:51 AM

अपघातांना आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी यासाठी ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याशी साधलेला हा संवाद...

राज्यभरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे, त्याबाबत काय सांगाल?लोकांपर्यंत रस्ता सुरक्षेचे महत्त्व पोहोचविणासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक ती जनजागृती होत नाही. वाहतूक नियम लक्षपूर्वक पाळले जात नाहीत. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. कित्येक जणांचा बळी जातो, काही जण जखमी होतात. ते अपघात रोखण्यासाठी, रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येतो. 

रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये कोणते उपक्रम राबविले जातात?या सप्ताहामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. राज्य स्तरावरचा कार्यक्रम सोमवारी १३ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याशिवाय शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे रस्ता सुरक्षेबद्दल प्रबोधन केले जाते. तसेच अधिक जनजागृतीसाठी जाहिराती केल्या जातात, होर्डिंग लावले जाते. बाइक रॅली, वॉकथॉन आयोजित केले जाते.

अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता तयार होताना रस्ता सुरक्षा ऑडिट करत असते. त्यामुळे रस्त्यात अभियांत्रिकी दोष असणार नाहीत याची काळजी घेतली जाते. त्याने अपघात रोखण्यास मदत होते. राज्यात असलेल्या १३२४ अपघातप्रवण क्षेत्रांवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १३२२ ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहेत.वाहतूक नियम न पाळणाऱ्या चालकांना आणि पादचाऱ्यांना काय आवाहन कराल?वाहतूक नियम न पाळणे हे अपघात होण्याचे प्रमुख कारण आहे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर केला जात नाही. परंतु नियम न पाळणे धोकादायक आहे. सीटबेल्ट आणि हेल्मेटमुळे अपघात झाल्यास जखमी, मृत्यू होण्यापासून वाचवता येऊ शकते. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. ८० टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. चालकांनी गाडी व्यवस्थित चालविली तर अपघात टाळता येऊ शकतात. कित्येक वेळा पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालविले जाते. वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. ते टाळले पाहिजे.पादचाºयांनी झेब्रा क्रॉसिंगचा नियम पाळला पाहिजे.

टॅग्स :कारअपघात