Join us  

नियमांचे उल्लंघन रिक्षा, टॅक्सीचालकांना भोवले, भाडे नाकरल्याने परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 3:19 AM

५४५ जणांचे परवाने रद्द : भाडे नाकारल्याची ९५३ प्रकरणे, तक्रारींनतर परिवहन विभागाची विशेष मोहीम

मुंबई : मुंबईत भाडे नाकारणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महागात पडले असून त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात फेब्रुवारी ते जुलैपर्यंत ८ हजार २३ तक्रारी आल्या. यामध्ये सहा हजार चारशे चालकांनी बॅच आणि परवान्यांशिवाय रिक्षा व टॅक्सी चालविल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तर ९५३ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. या प्रकरणी परिवहन विभागाने ५४५ अनुज्ञप्ती (लायसन्स) रद्द केले आहेत.

शहरातील वाहतूककोंडीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रिक्षा टॅक्सी चालकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कारण अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या या वर्तनाविरोधात परिवहन विभागाने फेब्रुवारीपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे, बॅच नसणे, गणवेश नसणे या तक्रारींसह वाहन चालक परवाना याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालय अंधेरी, प्रादेशिक परिवहन कार्यालय वडाळा (पू.), उप प्रादेशिक कार्यालय बोरीवली या तीन कार्यालयांमध्ये एकूण ८०२३ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये ९५३ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. तर २० जादा भाडे आकारण्याच्या तक्रारी आहेत.परिवहन विभागाने या तक्रारींनंतर राबविलेल्या मोहितेम ८४० चालक परवाना रद्दच्या नोटीस जारी केल्या आहेत, तर ५४५ चालक परवाने रद्द केले आहेत. तर बॅच आणि चालक परवानाशिवाय वाहन चालविण्याच्या ६४०५ तक्रारी आल्या आहेत. यातील ३३८२ नोटीस जारी करण्यात आल्या असून ८८२ जणांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच ६८० रिक्षांचे मीटर ताब्यात घेतले आहेत. १५८ रिक्षा, टॅक्सी जप्त करण्यात आल्या असून १४६ वाहने कारवाईनंतर सोडण्यात आली आहेत.

अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात २७१६ तक्रारी या रिक्षा-टॅक्सींसंदर्भात दाखल झाल्या आहेत. यापैकी ३३४ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. तसेच २५४९ तक्रारी बॅच आणि परवान्याशिवाय रिक्षा, टॅक्सी चालविण्याच्या आहेत. या प्रकरणी २४७ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे तर १८२ परवाना रद्द करण्यात आला असून १ रिक्षा जमा करून १८२ रिक्षांचे मीटर ताब्यात घेण्यात आले आहेत. वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात ४४४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी ४४७ तक्रारी भाडे नाकारण्याच्या, १८ तक्रारी जाडा भाडे आकारण्याच्या आहेत. तसेच २५४९ तक्रारी बॅच आणि परवानाविना रिक्षा, टॅक्सी चालविण्याच्या आहेत. त्यामुळे २३४ जणांचा परवाना रद्द केला आहे.मोहीम तीव्र करणार!रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडे नाकारतात आणि वाहतूक नियमांचे उलंघन करतात. त्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे. असे प्रकार अजूनही घडत असून ते रोखण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल.- शेखर चन्ने, आयुक्त परिवहन विभागबोरीवलीतून ८५९ तक्रारीउप प्रादेशिक परिवहन कार्यालय (बोरीवली)मध्ये ८५९ तक्रारी या रिक्षा-टॅक्सींसंदर्भात दाखल झाल्या आहेत. तक्रारींपैकी १७२ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. तसेच ५९० तक्रारी बॅच आणि परवान्याशिवाय रिक्षा आणि टॅक्सी चालविण्याच्या आहेत. या प्रकरणी ६४ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे तर ९२ बॅच आणि वाहन परवाना रद्द करण्यात आले आहेत. ५८ रिक्षा जमा करून ३८ रिक्षांचे मीटर ताब्यात घेण्यात आले आहेत.

टॅग्स :ऑटो रिक्षाटॅक्सीमुंबई