तळोजा : पावसाचा गैरफायदा घेऊन शहरातील तीनआसनी रिक्षाचालकांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. अव्वाच्या सव्वा भाडे आकारणीमुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. कळंबोली, कामोठे परिसरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीला परिसरातील रहिवासी बळी पडत आहेत. मीटरप्रमाणे भाडे आकारावे अशी मागणी वारंवार केली जात आहे, तशा सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर सुद्धा रिक्षा चालक या सूचना पायदळी तुडवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिसरातील रिक्षा चालकांकडून सध्या मनमानीभाडे आकारले जात आहे. पावसात रिक्षातून प्रवास करायचा झाला तर रिक्षा चालक गैरफायदा घेत आहेत. इच्छितस्थळी उतरल्यानंतर प्रवाशांकडून ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे चालकांकडून उकळण्यात येत आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानी वसुलीला चाप बसवण्याची मागणी येथील स्थानिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
रिक्षाचालकांची कामोठेत मनमानी
By admin | Updated: June 15, 2015 05:54 IST