कल्याण : येऊ घातलेल्या पावसाळयाच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक घेऊन सतर्कतेच्या सूचना केल्या. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला पालिका अधिका-यांव्यतिरिक्त महावितरण, एमआयडीसी आणि आरटीओ चे अधिकारीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची खड्डे भरण्याची कामे ३० मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश आयुक्त पाटील यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले. नेतीवली टेकडी परिसरात भूस्लखन होण्याची शक्यता लक्षात घेता तेथील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात असे संबंधित प्रभाग क्षेत्र अधिका-यांना सांगण्यात आले. सखल भागात पाणी साचल्यास प्रभाग अधिका-यांनी तातडीने त्याठिकाणी उपस्थित राहून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. रस्त्यांवरील गटाराचे झाकणे सुस्थितीत ठेवावीत, झाकणे उघडी आढळल्यास संबंधित अभियंत्यास जबाबदार धरण्यात येईल, असेही बजावण्यात आले. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईचा अहवाल सादर करा, दैनंदिन साफसफाईसाठी स्वच्छता पथके तैनात ठेवावीत असे निर्देश ही देण्यात आले. पालिका रूग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरीकांना रूग्णवाहीकेची आवश्यकता भासल्यास १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
आपत्ती व्यवस्थापनाचा आयुक्तांकडून आढावा
By admin | Updated: May 22, 2014 04:21 IST