मनोर : रेती वाहतुकीचे परवाने बंद असले तरी, महसूल विभागाच्या आशीर्वादाने पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्री अवैध रेती वाहतूक सुरू आहे. यात शासनाचे मोठे नुकसान होत असून अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र याचे कोणत्याही अधिकाऱ्यांना देणेघेणे नसल्याचे चित्र आहे.वैतरणा, सूर्या, तानसा नदीतील अनेक बंदरात रात्री रेतीचे उत्खनन सुरु असून रात्रभर तिची वाहतूक केली जात आहे. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी मात्र दोन ट्रकवर कारवाई करतात आणि दहा ट्रक सोडतात, अशी परिस्थिती येथे आहे. विशेष म्हणजे, त्यांनी दिलेल्या वेळत रेती चोरटे वाहतूक करीत नियम धाब्यावर ठेवत आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली असून अनेकवेळा अपघाताच्या घटनाही दडपण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर तहसीलदार चंद्रसेन पवार मिटींगमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
रेतीवाहतुकीला महसूलचा आशीर्वाद?
By admin | Updated: June 2, 2015 22:51 IST