Join us

सुरक्षारक्षक भरतीला पुन्हा ग्रहण

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

महापालिकेने २००३ मध्ये प्रथम भांडुप बोर्डाचे ६५ सुरक्षारक्षक घेतले होते.

ठाणे : एकीकडे भांडुप बोर्डाच्या ३८५ सुरक्षारक्षकांना तीन महिने वेतनापासून वंचित राहावे लागल्याची वेळ आली असतानाच आता महापालिकेच्या ३८५ सुरक्षारक्षकांच्या भरतीलासुद्धा ग्रहण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या भरतीसाठी तब्बल ७५ हजार अर्ज आले असताना महापालिकेने दहावी परीक्षेत उमेदवाराला मिळालेली टक्केवारी ग्राह्य धरून त्यांना मैदानी चाचणीसाठी पाचारण केल्याने हजारो इच्छुक उमेदवारांची घोर निराशा झाली आाहे. त्यामुळे काहींनी आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेने २००३ मध्ये प्रथम भांडुप बोर्डाचे ६५ सुरक्षारक्षक घेतले होते. त्यानंतर, महापालिकेतील सुरक्षारक्षकांची संख्या टप्प्याटप्प्यांनी घटल्याने पालिकेने बोर्डाचे ३८५ सुरक्षारक्षक आपल्यात सामील करून घेतले. त्यानंतर, तीन वर्षांपूर्वी महापालिकेने स्वत:चे सुरक्षारक्षक घेण्यास सुरुवात करून पहिली भरती प्रक्रिया सुरू केली. या वेळी ६५ सुरक्षारक्षकांसाठी १७ हजारांच्या आसपास अर्ज आले होते. परंतु, या वेळी यात महापालिकेकडून चूक झाल्याने एका उमेदवाराने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर, या प्रक्रियेला स्थगिती आली. त्यामुळे महापालिकेला पुन्हा बोर्डाच्या सुरक्षारक्षकांवर विसंबून राहावे लागले. अखेर, मागील वर्षी ३८५ सुरक्षारक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि पालिकेने सुरक्षारक्षकांची भरती सुरू केली. या भरतीसाठी ७५ हजार अर्जांचा पाऊस पडला. या अर्जांची छाननी करून ६० हजार उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले. त्यानुसार, महापालिकेने मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू केली. परंतु, पहिल्या तीन दिवसांतच अपेक्षेपेक्षा अधिक उमेदवार मैदानावर दाखल झाल्याने पालिकेने ही प्रक्रियाच रद्द केली. त्यानंतर, शिल्लक राहिलेल्यांना टोकन देण्यात आले आणि पुढील प्रक्रिया आॅनलाइन घेण्याचे पालिकेने निश्चित केले. आॅनलाइन अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराला वाटले की, आपल्याला कॉल केले जाईल. परंतु, पालिकेने जातीनिहाय भरती प्रक्रिया सुरू करताना ७० टक्क्यांना यादी बंद केली. त्यामुळे ७० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले, त्यांना द्वार बंद झाले आहे.७० टक्के गुण मिळालेले उमेदवार ग्राह्यधरले तर केवळ २० ते २५ हजार उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. परंतु, उर्वरित सुमारे ३५ हजार उमेदवारांना संधीच न मिळाल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. एवढे गुण असते तर आम्ही या ठिकाणी अर्ज केले असते का, असा सवाल काही उमेदवारांनी केला आहे. रोज सुरक्षारक्षक विभागाला २० ते २५ फोन येत असून आमचा नंबर कधी लागणार, असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)