मोहोपाडा : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील धागानिर्मिती करणाऱ्या रिलायन्स इंड. प्रा. लिमिटेड या कारखान्यातील दोन हजारांपेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी १0 मेपासून बेमुदत संप पुकारला असून संपाला चाळीस दिवस होवूनही संप शांतता मार्गाने सुरळीत सुरू आहे. याकरिता कंत्राटी कामगारांची सभा मोहोपाडा एचओसी कॉलनी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात पार पडली. यावेळी सभेला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार विद्या चव्हाण व समाजसेविका उल्का महाजन आदी उपस्थित होते.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, जोपर्यंत कंत्राटी कामगारांचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत कंत्राटी कामगारांच्या विरोधात असणाऱ्यांना शांत बसू देणार नाही. कंत्राटी कामगारांचा प्रश्न न सुटल्यास अधिवेशनात कायदा मंजूर करताना विरोध करणार आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर तुमच्या संपाचा विषय मांडणार असल्याचेही मुंडे म्हणाले. यावेळी आमदार विद्या चव्हाण यांनी विधानसभेला घेराव घालू असे सांगितले.रिलायन्स इंड. कारखान्यातील १७00 पेक्षा जास्त कंत्राटी कामगार हे स्थानिक असून कंपनीत कायमस्वरूपी कामगारांच्या बरोबरीने उत्पादन प्रक्रि येत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समान काम, समान वेतन, नोकरीवर सतत असलेल्या टांगत्या तलवारीतून सुटका व्हावी, यासाठी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करावे या मागणीसाठी मागील सहा महिन्यांपासून कामगारांचा लढा सुरू असून कारखाना प्रशासन दखल घेत नसल्यामुळे कामगारांचा संप चाळीस दिवस होवूनही सुरू आहे. यावेळी सर्व कंत्राटी कामगारांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. (वार्ताहर) सध्याच्या वाढत्या महागाईत घर, मुलांचे शिक्षण तसेच कर्जाचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत असून प्रचंड नफ्यात असतानाही रिलायन्सने कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे.- सुनील शिंदे, कामगारांचे कुटुंबीय
रिलायन्सच्या कामगारांचा संप सुरूच
By admin | Updated: June 19, 2015 00:53 IST