मुंबई : विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील म्हाडाने अतिधोकादायक जाहीर केलेल्या संक्रमण शिबिरातील ७0 कुटुंबीयांचा जीव धोक्यात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची गंभीर दखल घेत म्हाडाने धोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावला आहे. ५५ कुटुंबीयांना पर्यायी इमारतीमध्ये हलविण्यात आले असून उर्वरित कुटुंबीयांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार आहे.म्हाडामार्फत गतवर्षी पावसाळापूर्व करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणामध्ये कन्नमवार नगरातील १२८, १२९, १३३, १३४ क्रमांकांच्या इमारती अतिधोकादायक आढळल्या. या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने या इमारतींमध्ये वास्तव्य करत असलेल्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत ४ आॅगस्ट रोजी ‘७0 कुटुंबीयांचा जीव धोक्यात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चार धोकादायक इमारतींमध्ये राहणारे आणि इतर इमारतींमधील सुमारे १२८ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे.धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे कन्नमवार नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. ५५ कुटुंबीयांना नवीन इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे पुनर्वसन
By admin | Updated: August 28, 2015 04:05 IST