ठाणे : येथील वर्तकनगरमधील पोलीस वसाहतीमधील इमारती धोकादायक घोषित करण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या इमारतींतील ५६० घरांमधील पोलिसांच्या कुटुुंबीयांचे म्हाडाच्या इमारतींमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महापालिकेला सोमवारी दिले. येथील पोलिसांना घरे खाली करण्याचे आदेश निवडणुका संपताच देण्यात आले आहेत. या कुटुंबीयांना ठाणे पोलीस आयुक्तालयाने २ दिवसांत घरे खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे ते भयभीत झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी या गृहिणींनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाईक यांची सभागृहात भेट घेऊन तत्काळ पुनर्वसन करण्यासाठी लेखी निवेदन दिले. यास अनुसरून सभागृहात यावर चर्चा झाली. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करणे शक्य होत असल्यामुळे त्यास अनुसरून या कुटुंबांचेदेखील पुनर्वसन करणे शक्य असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी केले. यामुळे या पोलीस कुटुंंबीयांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेच्या ताब्यात म्हाडाची १ हजार ४४६ घरे आहेत. १६० चौरस फुटांच्या या घरांत या कुटुुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु ही घरे अत्यंत लहान असल्यामुळे या दोन घरांचे एक घर करून सुमारे ३२० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर या पोलीस कुटुंबीयांना देण्यात यावे, अशी मागणी सरनाईक यांनी लावून धरलेली आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री व ठाणे महापालिका आयुक्त यांनी शब्द दिला नसला तरी धोकादायक इमारतींमधील कुटुंबांचे जसे तात्पुरते पुनर्वसन केले जाते. तसे याही कुटुंबांचे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. म्हाडाच्या या इमारतींमध्ये कळवा, मुंब्रा या परिसरात कोसळलेल्या इमारतींमधील रहिवाशांचेही पुनर्वसन झालेले आहे. त्याप्रमाणे याही कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या वेळी सभागृहात पालक सचिव के.पी. बक्षी, ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू आदींसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वर्तकनगरमधील पोलीस कुटुंबीयांचे पुनर्वसन!
By admin | Updated: May 20, 2014 01:20 IST