मुंबई : मुंबईत बांधण्यात आलेल्या पुलांच्या परिरक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेची असते. पुलांच्या मजबुतीबाबत वेळोवेळी स्थैर्यता सर्वेक्षण करून त्याची नोंद पुलाच्या परिरक्षणासाठी महापालिकेच्या संबंधित कार्यालयात उपलब्ध असणे आवश्यक असते. याबाबत मुंबई महापालिका उदासीन असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय माहिती अधिकार कार्यकर्ता परिषदचे संयोजक शरद यादव यांनी पुलांच्या संरचनात्मक स्थैर्यबाबतची माहिती महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. यावर महापालिकेने कार्यक्षेत्रातील सर्व पुलांच्या परिरक्षणासंबंधी पूल खात्यामार्फत पुलांच्या परिरक्षणाबाबत सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात येत असल्याचे उत्तर दिले आहे; शिवाय मुंबईमधील सर्व पुलांच्या तपासणीसह धोकादायक पुलांबाबतच्या उपाययोजनेबद्दलही सल्लागाराकडून सल्ले घेण्यात येतील आणि त्यानुसार पुलांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे कळविले आहे. प्रत्यक्षात हे सर्व कागदावर असल्याने शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
पुलांच्या परिरक्षणाबाबत महापालिका उदासीन
By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST