Join us

वाड्यात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

By admin | Updated: March 29, 2015 22:44 IST

पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे.

वाडा : पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे. दैनंदिन आहारात टोमॅटो महत्वाचा घटक आहे. उन्हाच्या दिवसात खाण्यास टोमॅटोला पसंती दिली जाते. वसई तालुक्यातील आणडे, भाताणे येथे टोमॅटोची लागवड केली जाते. ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये याचे तुरळक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाडा तालुक्यात कुणबी सेना सत्तेवर आली तेव्हा देवघरचे प्रफुल्ल पाटील हे उपसभापती झाले आणि त्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थसहाय्य घेवून शिवजलधारा योजनेअंतर्गत गावातील बहुसंख्य लोकांना टोमॅटो शेतीसाठी बोअरवेल दिल्या आणि तेव्हापासून देवघर गावात टोमॅटोचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. डोंगराच्या कुशीत बसून देखील सिंचनो कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शिवजलधारा योजनेचा प्रयोग पाटील यांनी प्रथम स्वत:च्या गावात करून तो यशस्वी केला. वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून २३ कि.मी. तर कुडूसपासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात शेतकरी अभिनव आणि अलंकार हे टोमॅटोचे बियाणे आणून स्वत:च रोप तयार करतात व स्वत:ची लागवड करून रोपांची विक्री देखील करतात.एक एकर मधून १५०० क्रेट टोमॅटो निघतात त्याचे वजन ४५ ते ५५ टन असते. त्यासाठी २५०० ते ३००० रुपयांचे ५ पॅकेट बियाणे लागते. खत फवारणी तसेच मजुरी हा खर्च एकरात अंदाजे दीड लाख रुपये येतो. टोमॅटोला ७ ते १५ रु. प्रति किलो भाव मिळत असल्याने एकरी ३ लाख १२ हजारापर्यंत उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शहरात या टोमॅटोला मोठी मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने हा टोमॅटो दलालामार्फत विकला जातो.