वसई : एकेकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतचा परिसर पेट्रोल व डिझेल भेसळीसाठी कुप्रसिद्ध होता. आता त्याऐवजी हा परिसर बोगस मिनरल वॉटर कंपन्यांमुळे नावारुपाला आला आहे. गेल्या काही वर्षात विरार पूर्व पेल्हार, कामण या परिसरात मिनरल वॉटर कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अटी व शर्ती न पाळता सरसकट या कंपन्यांनी आपले वॉटरप्लांट सुरू केले. गेल्या महिन्याभरात प्रशासनाने अनेक कंपन्यांवर धाड टाकून संबंधीत व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.काल पेल्हार स्थित एका मिनरल वॉटर कंपनीवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तपासणी केली असता कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता पाण्याच्या बाटल्या भरत असल्याचे निदर्शनास आले. या धाडीचा सुगावा लागताच कंपनीची मालकीण व व्यवस्थापक फरार झाले. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता या कंपन्या मिनरल वॉटरच्या बाटल्या अनेक दुकानदारांना पुरवत आहेत. हे पाणी पिण्यास अत्यंत अयोग्य असून रोगराईची भीती आहे.
बोगस मिनरल वॉटर कंपन्यांचा सुळसुळाट
By admin | Updated: March 12, 2015 22:58 IST