Join us

मुंबापुरी विसर्जनासाठी सज्ज

By admin | Updated: September 8, 2014 02:06 IST

तब्बल १० दिवस श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर मुंबईकरांकडून सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.

मुंबई : तब्बल १० दिवस श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर मुंबईकरांकडून सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ढोल-ताशा, टाळ-मृदुंग, नाशिक बाजा आणि डीजेच्या आवाजात शहर आणि उपनगरांतील रस्ते विसर्जन मिरवणुकांनी गजबजून निघणार आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा जयघोष मिरवणुकांत रंगणार असून, गणेशभक्तांना गणेशमूर्तींचे व्यवस्थित विसर्जन करता यावे यासाठी मुंबापुरीतील चौपाट्यांसह तलाव आणि कृत्रिम तलाव सज्ज झाले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांच्या सर्व यंत्रणा, आरोग्यसेवा आणि इतर सेवा खात्याच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रशासकीय संस्था, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशोत्सव समिती, पोलीस यंत्रणा, शासकीय व इतर सर्व संस्थांच्या सहकार्याने विविध सेवा पुरविल्या जाणार आहेत. २०१३ साली २ लाख ७ हजार ६४१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते आणि या वर्षी २ लाख १० हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होईल, अशी शक्यता महापालिकेने वर्तविली आहे. शिवाय मुंबईतील विविध रस्त्यांवर ४४२ खड्डे निर्माण झाले होते. त्यापैकी ४२४ खड्डे भरण्यात आले आहेत, असा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. उर्वरित खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. गणेशविसर्जन मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात रस्ते अभियंते नेमण्यात आले आहेत. सर्व विसर्जन स्थळांवर विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)