नवी मुंबई : सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने आज दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. १७ ठिकाणी वृक्ष व फांद्या कोसळल्या.गेल्या शुक्रवारपासून पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे. सोमवारी रात्री जोरदार बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण सकाळपासून काहीसे कमी झाले. मात्र सोसाट्याचा वारा सुटल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. जोरदार वाऱ्यांमुळे वृक्ष व मोठ्या फांद्या कोसळल्याच्या १७ घटना घडल्या. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रहिवाशांचे हाल झाले. विशेषत: सायन-पनवेल मार्गावरील वाशी जंक्शनच्या बस थांब्यावर गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना कसरत करावी लागली. त्याचप्रमाणे नेरूळ येथील एलपी बस थांब्याजवळही पाणी साचले होते. सीबीडी येथील बस डेपोचा परिसर जलमय झाला. शहरातील बहुतेक भुयारी मार्गांत गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्याचा फटका या मार्गातील वाहतुकीला बसल्याने अनेक ठिकाणी वाहनांचा चक्का जाम झाल्याचे दिसून आले. आपत्ती निवारण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात सरासरी ३२.६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
पावसाचा धुमाकूळ
By admin | Updated: June 24, 2015 04:54 IST