Join us

धोधो पावसातही पाण्यासाठी वणवण!

By admin | Updated: July 17, 2017 01:05 IST

एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे. महिनाभर या ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी, रहिवाशांना बोअरिंग आणि टँकरचा आधार घ्यावा लागला असून येथील रस्ताही दलदलीत सापडल्याने त्यांची पायवाटही बिकट झाली आहे. गटारांच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणी साथीचे आजारही बळावले आहेत. केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांमध्ये नांदिवली गाव, मीनल पार्क हा प्रभाग येतो. या ठिकाणी रविकिरण सोसायटी असून या सोसायटीअंतर्गत ४० टॉवर बांधण्यात आले आहेत. परंतु, आजघडीला येथील बहुतांश टॉवरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. महिनाभर ते टँकर आणि बोअरिंगच्या पाण्याचा वापर करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रुपयांची बिले पाठवली जातात. ते रहिवासी भरतातही. पण, पाण्याची कायम बोंब असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील चाळींना मुबलक पाणी आहे. पण, टॉवरवासीयांना पाणी नाही. अखेर, या रहिवाशांना चाळींचा आधार घ्यावा लागला आहे. विकासकाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने या दलदलीतून वाट काढतच संबंधित रहिवाशांना येजा करावी लागत आहे. येथील स्मृती टॉवर आणि त्या परिसरातील अन्य टॉवरकडे जाण्यासाठी गटाराच्या पाण्यातून जावे लागते. दलदलीमुळे डासांची पैदास होऊन स्मृती टॉवरमधील ६ ते ७ जण डेंग्यूने आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.