Join us  

प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे पोलीस उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:10 AM

२०१६ मध्ये मुंबईतील रेल्वे पोलीस ठाण्यांत एकूण ३ हजार ७०७ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रवासी गुन्हेगारांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत असल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस हद्दीत रोज सरासरी १०५ गुन्हे घडतात; यापैकी केवळ ११ गुन्ह्यांची उकल होत आहे.यंदा जानेवारी ते एप्रिल या काळात मुंबई लोहमार्ग हद्दीत १२ हजार ६५५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ १ हजार २८७ गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. चार महिन्यांत १२ हजार म्हणजे दिवसाला सरासरी १०५ गुन्हे घडत आहेत. गुन्ह्यांची उकल करण्याची क्षमता प्रतिदिन सरासरी केवळ ११ इतकीच आहे. मुंबई रेल्वे पोलिसांचा व्हीआयपी बंदोबस्त, लोकल बोगीत पेट्रोलिंग अशा कारणामुळे मुंबई रेल्वे हद्दीतील गुन्हेगारांचे फावते. त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे.२०१६ मध्ये मुंबईतील रेल्वे पोलीस ठाण्यांत एकूण ३ हजार ७०७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये यात ६ पटीने वाढ झाली. २०१७ मध्ये २५ हजार ४१६ गुन्ह्यांची नोंद झाली. गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना मात्र गुन्ह्यांची उकल करण्याचा वेग मंदावला आहे. २०१६ मध्ये केवळ २ हजार १३२ आणि २०१७ मध्ये केवळ ३ हजार ९६१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि चर्चगेट ते पालघर अशी १७ रेल्वे पोलीस ठाणी आहेत. यापैकी मध्य परिमंडळात १० आणि पश्चिम परिमंडळात ७ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयासाठी एकूण ३ हजार ७८० पदे मंजूर असून यापैकी २०० पदे रिक्त आहेत. एकंदरीत मुंबई लोहमार्गावरील सुमारे ७५ लाख प्रवाशांसाठी केवळ ३ हजार ५८० पोलीस कार्यरत आहेत. (पूर्वार्ध)

टॅग्स :लोकलरेल्वे