Join us

रेल्वेमार्ग खारफुटीच्या मुळावर

By admin | Updated: June 16, 2015 23:43 IST

नेरूळ - उरण मार्गाच्या कामामुळे सीवूड परिसरात खारफुटी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराने टाकलेल्या भरावामुळे

नवी मुंबई : नेरूळ - उरण मार्गाच्या कामामुळे सीवूड परिसरात खारफुटी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराने टाकलेल्या भरावामुळे पाणी जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भरतीचे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडको व रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. सीवूड रेल्वे स्टेशन ते खाडीदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खारफुटीचे मोठे जंगल आहे. सेक्टर ५० मध्ये होल्डिंग पाँड आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी या होल्डिंग पाँडपर्यंत येते. परंतु रेल्वेचे काम करताना पामबीच रोडला लागून पाणी जाण्याच्या मार्गातच मातीचा भराव टाकण्यात आला आहे. अर्ध्या भागात पिलर उभा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे भरतीचे पाणी येण्यास अडथळा निर्माण होत आहे. पाण्याच्या वेगाने सोमवारी मातीचा भराव वाहून नेला. परंतु भविष्यात पुरेशी जागा ठेवली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. विकासकामे करताना खारफुटी नष्ट होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी सेक्टर ५० मधील मारवेल सोसायटीसमोर खारफुटी नष्ट झाली आहे. योग्य लक्ष दिले नाही तर रतन आयकॉन इमारतीच्या बाजूला व महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असणारी खारफुटीही नष्ट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)- रेल्वे लाइनचे काम सुरू असताना सेक्टर ५० मधील पाणी खाडीकडे नेणाऱ्या नाल्यातील भराव बाजूला केला पाहिजे. भविष्यात भरतीचे पाणी उलट्या दिशेने त्याला अडथळा निर्माण करणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. योग्य खबरदारी घेतली नाही तर, त्याचा फटका सेक्टर ५० मधील रहिवाशांना बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. माहिती घेण्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, याविषयी संबंधित विभागाकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती घेतली जाईल, असे सांगण्यात आले. - सीबीडीचे विभाग अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी सांगितले की, रेल्वेचे काम करताना नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होऊ नये, या परिसरातील खारफुटीला धक्का लागू नये अशा सूचना केल्या आहेत. योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. - रेल्वे लाइन नागरिकांसाठी गरजेची आहेच, परंतु ते काम करत असताना निसर्गाचा समतोल राखला गेला पाहिजे. खारफुटी नष्ट झाल्यास सेक्टर ५० मधील रहिवाशांना पुराचा धोका आहे. आम्ही पाठपुरावा सुरू केला असून याविषयावर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी समीर बागवान यांनी दिली आहे.