मुंबई : दरवर्षी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात आणि त्यामुळे उपनगरीय लोकल पूर्णपणे विस्कळीत होते. यंदाही ट्रॅक पाण्याखाली जाऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे करण्यात आली. मात्र या कामांचा फज्जा उडाला. शुक्रवारी पश्चिम रेल्वेमार्गावर एलफिन्स्टन, माटुंगा आणि वांद्रे येथे तर मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइनवर मशीद, भायखळा, करी रोड, दादर, परेल, कुर्ला, विद्याविहार तर हार्बर मार्गावरील वडाळा, टिळक नगर, चेंबूर, कुर्ला आणि वाशी येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. येथे रेल्वेकडून पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले; मात्र या पंपांमधून पाणी उपसण्याचे काम व्यवस्थित होत नव्हते. ट्रॅकवरील पाणी हटत नसल्याने त्याचा फटका लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बसत होता. या वेळी रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबणाऱ्या २६ ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यात मध्य रेल्वेवर १७ तर पश्चिम रेल्वेवरील ९ ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांवर डिझेल पंप बसविण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु हे पंप बसवूनही त्याचा फायदा झाला नाही. यातील काही पंप सुरूच होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सिग्नल यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी मध्य रेल्वेकडून ९५0 मल्टि सेक्शन डिजिटल एक्सेल काउंटर यंत्रणा ठिकठिकाणी बसविण्यात आली आहे. मात्र ही यंत्रणादेखील फेल ठरली. पश्चिम रेल्वेला धारावी नाला आणि मिठी नदीचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पडलेल्या पावसात धारावीतला नाला वाहू लागला. त्यामुळे सायन, परेल आणि एलफिन्स्टन, माटुंगा स्थानकांवर पाणी साचले. मध्य रेल्वेलाही मिठी नदीचा सर्वांत जास्त धोका असून, शुक्रवारी हीच नदी ओव्हरफ्लो होणार होती. मात्र तसे न झाल्याने मध्य रेल्वेला मोठा फटका बसला नाही.
रेल्वेची पूर्वतयारी गेली पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2015 02:07 IST