मुंबई : मुंबई शहर व उपनगरात धावणाऱ्या लोकलचा प्रवास हा धोकादायक जरी मानला जात असला तरी काही प्रमाणात रेल्वेच्या दुर्लक्षामुळे तर काही प्रवाशांच्या चुकांमुळे तो धोकादायक होत असल्याचे निदर्शनास येते. रेल्वेतून प्रवास करताना सध्या रेल्वे हद्दीत असणारे खांब प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. या खांबांवर आदळून २0१४पासून ते आतापर्यंत २४ ठार तर १४९ प्रवासी जखमी झाल्याचे रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) सांगण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना तसेच लोकलमधून पडून मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांमध्ये प्रवाशांचा जीव जात असून, गंभीर जखमीही होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांनंतर रेल्वेच्या खांबांना आदळूनही अपघातांच्या अनेक घटना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंंबई शहर व उपनगरात रेल्वेतून प्रवास करताना दरवाजाजवळ लटकू नका किंवा जास्त डोकावू नका, असे आवाहन अनेकदा रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात येते. मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्षच करताना दिसतात. दरवाजाजवळ लटकताना काही प्रवाशांकडून स्टंटही केले जातात आणि अशा प्रवाशांना रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या खांबांचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. त्यातच गर्दीच्या वेळी दरवाजाजवळ लटकणाऱ्या बहुतांश वेळेला त्याचा फटका बसत असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. यामुळे २0१४पासून आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून, १४९ प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला व कल्याण रेल्वे पोलीस हद्दीत त्याचप्रमाणे हार्बरवरील वडाळा तर पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली स्थानक व हद्दीत या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रेल्वेत महिला असुरक्षितच!रेल्वेतून प्रवास करताना पुरुषांनी सतत महिलेकडे पाहणे, कमेंट पास करणे, गर्दीतून जाताना मुद्दाम स्पर्श करणे, चिमटा काढणे असे प्रकार महिला प्रवाशांबरोबर सातत्याने घडत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवास हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. दररोज हजारो महिला रेल्वेने प्रवास करत असतात. लांब राहणाऱ्या महिला दररोज दीड ते दोन तास रेल्वेतून प्रवास करतात. सकाळ, संध्याकाळ रेल्वेत गर्दी असते तरीही महिलांना प्रवास करताना सुरक्षित वाटत नसल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. अक्षरा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ५२२ महिला प्रवाशांच्या मुलाखती घेतल्या. यात ३७४ महिला या नियमित प्रवास करणाऱ्या होत्या तर १७५ महिला या कधीतरी प्रवास करणाऱ्या होत्या. मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरणच आहे. अनेकदा या गर्दीचा फायदा घेतला जातो. फलाटावरून चालताना जागा असूनही धक्का मारणे, मुद्दामून स्पर्श करणे असे अनुभव अनेकदा येत असल्याचे ६०.९२ टक्के महिलांनी सांगितले. याचा खूप त्रास होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. ही घटना काही सेकंदांत घडते. त्यामुळे प्रतिक्रिया देताही येत नाही, असेही महिलांनी स्पष्ट केले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५६.१३ टक्के महिलांनी पुरुष सतत बघत राहण्याचा त्रास होत असल्याचे सांगितले. स्टेशनवर उभं असताना, पुलावरून जाताना किंवा अनेकदा दोन डब्यांमध्ये जाळी असते त्यातून पुरुष पाहत राहतात. याचा मानसिक त्रास होतो. पण, या गोष्टीवर अनेकदा प्रतिक्रियाही देता येत नाही. एखादी महिला जात असल्यास अश्लील शेरेबाजी करणे, महिलेला उद्देशून काहीतरी बोलणे हा अनुभव नेहमीचा असल्याचे ५१.३४ टक्के महिलांनी सांगितले. २९.६९ टक्के महिलांनी त्यांचा पाठलाग केला जात असल्याचा अनुभव घेतला आहे. तर, २०.५० टक्के महिलांनी चिमटे काढले जातात असे सांगितले. १५.५२ टक्के महिलांनी शरीर चाचपले जाते असे सांगितले. रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा असणारा अभाव हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर पुरुष प्रवाशांची मानसिकता आणि पोलिसांची मानसिकता याचाही परिणाम आहे.
रेल्वेचे खांब ठरताहेत धोकादायक
By admin | Updated: December 7, 2015 01:34 IST