महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो कारखान्यातील लक्ष्मण पवार या कामगाराचे रविवारी हृदयविकाराने निधन झाल्याच्या घटनेने सोमवारी औद्योगिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मृत कामगाराचे शव ताब्यात घेतले जाणार नाही, असा पवित्रा मृत कामगाराचे कुटुंबीय व भादेकोंड ग्रामस्थांनी घेतल्याने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सकाळपासून हे संतप्त ग्रामस्थ एम्बायो कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून होते. मात्र व्यवस्थापनाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या रोषाला व्यवस्थापनाला काही काळ सामोरे जावे लागले. मात्र दुपारनंतर झालेल्या बैठकीत येत्या पाच दिवसात या मागणीवर विचार करून नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. व त्यानंतर मृत लक्ष्मण पवार यांचे शव रुग्णालयातून घरी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. लक्ष्मण पवार हा कामगार रविवारी सकाळच्या पाळीमध्ये कामावर आलेला होता. स. ९ वा. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो परवानगी घेवून घरी जाण्यास निघाला, याची परिस्थिती लक्षात घेवून त्याला वाहनाने रुग्णालयात नेणे अपेक्षित होते. मात्र व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप ग्रामस्थ करीत आहे. लक्ष्मण पवार हा पायी घरी गेला व नातेवाइकांना घेवून रुग्णालयात गेला, देशमुख नर्सिंग होम येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मरण पावला. व्यवस्थापनाने त्याला रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचले असते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
मृतदेह ताब्यात घेण्यास कुु टुंबीयांचा नकार
By admin | Updated: May 4, 2015 23:47 IST