Join us

नैसर्गिक जलाशयाचे पाणी होणार शुध्द

By admin | Updated: March 13, 2015 22:31 IST

पनवेल तालुक्यातील नैसर्गिक जलाशयाचे पाणी जैविक पध्दतीने स्वच्छ करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी खर्चाची आहे.

वैभव गायकर, पनवेलपनवेल तालुक्यातील नैसर्गिक जलाशयाचे पाणी जैविक पध्दतीने स्वच्छ करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी खर्चाची आहे. चंदन, वाळा, तुळशी, गुलाब यासारख्या वनस्पतींचे अर्क काढून त्याचे खडे तयार करण्यात येणार असून, ते जलाशयांमध्ये टाकण्यात येणार आहेत. यामुळे जलशुध्दीकरणास मदत होईल. पनवेलमध्ये सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यात १७७ गावे असून ३०० विहिरी, ४५० कूपनलिका, १२५ तलावांचा समावेश आहे. तालुक्यातील टेंभोडे, वलवली तसेच नेरे परिसरातील आदिवासींना कूपनलिकेतून पाणी काढावे लागते. पाण्यात मिसळलेले क्षार, माती आणि विविध घटकांमुळे पाणी दूषित झालेले असते. पाणी शुध्द करण्यासाठी इतर प्रणालीचा वापर केला असता ते वेळकाढू व खर्चिक असल्यामुळे ते परवडणारे नाही. यामुळेच जैविक पध्दतीने पाणी शुध्द करण्यासंदर्भात विचार करण्यात आला आहे. यासाठी नाशिकमधील भारद्वाज इन्फोटेक या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पध्दतीत कोणतेही बांधकाम करावे लागत नाही, यंत्रसामग्री किंवा मनुष्यबळाची आवश्यकता नाही, विजेची गरज भासत नाही, सेंद्रिय खताची निर्मिती करण्यास मदत होते, या पाण्यामुळे शेतीची सुपिकता वाढते आदी फायदा या उपक्रमातून होणार आहे. उदय भावाळकर यांनी आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थानमध्ये अशाप्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. जिल्ह्यातील चवदार तळे या ऐतिहासिक तळ्यावर जैविक स्वच्छता साधनाचा वापर करण्यात आला आहे. याकरिता जिल्हा नियोजन मंडळाकडून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.