भार्इंदर : शहरातील झोपडपट्ट्यांना गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवले असून त्या त्वरित पुरवाव्यात या मागणीसाठी भाजपाने सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. शहरात सुमारे ५० हजार झोपड्या असून त्यातील बहुतांशी पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेकदा मागणी करूनही त्यांना त्या सुविधा देण्यात आल्या नसल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेहता यांनी केला आहे. या सुविधा त्यांना त्वरित मिळाव्यात, यासाठी मेहता यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पालिका प्रशासनासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सभा घेतली. त्यावेळी मेहता यांनी केलेल्या भाषणात करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या पालिका प्रशासनाने जनतेला पायाभूत सुविधा पुरविणे त्यांचे कर्तव्य असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्य करणाऱ्या झोपडीधारकांना घरपट्टी आकारली नसल्याने त्यांना पाणी व वीज या अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत. (प्रतिनिधी)
झोपडपट्ट्यांना सुविधा पुरवा
By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST