Join us

सोमवारपासून प्रचाराची रणधुमाळी

By admin | Updated: May 30, 2015 22:35 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली. सोमवार १ जुन रोजी अर्ज मागे घेण्याच्या वेळेनंतर ११५ प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. राजकीय पक्षांचे उमेदवार कोण आहेत हे आता स्पष्ट होणार आहे.यंदा रिंगणामध्ये ८ ते १० राजकीय पक्ष उतरल्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान ५ ते ६ उमेदवार असतील. एकूण ७४७ उमेदवारांपैकी शंभर ते सव्वाशे उमदेवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागतील. यावेळी प्रचारामध्ये प्रामुख्याने विकासाचा मुद्दा चर्चेत राहील असा अंदाज आहे. गेल्या ५ वर्षात महानगरपालिका क्षेत्रात हजारो कोटी रू. ची विकासकामे पार पडली. या सर्व विकासकामात क्षेत्रातील प्रमुख रस्त्याचे रूंदीकरण या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे. विविध संस्था व केंद्र सरकारच्या माध्यमातुन ही सर्व विकासकामे करण्यात आली. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा नव्याने उभा ठाकला आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिरीक्त धरण उभे करणे तसेच अस्तित्वात असलेले स्त्रोत अधिक प्रमाणात विकसीत करणे अशा कामांना प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. तसेच उद्या सुर्या प्रकल्पातुन अतिरीक्त पाणी उचलणे, कवडास येथे अतिरीक्त गेट बसवणे, तसेच विक्रमगड तालुक्यातील देहर्जे नदीतुन पाणी मिळवणे अशा ३ स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नात यश आल्यास वसई विरार उपप्रदेशाची पाणीटंचाई कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता आहे. आरोग्य क्षेत्रातही मनपातर्फे अनेक विकासकामे करण्यात आली. दररोज होणारी साफसफाई, कचऱ्याचे निर्मूलन व रोगराई पसरु नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अशा स्तरावर प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी अर्थसंकल्पातही दरवर्षी भरीव तरतुद करण्यात येत होती. डंम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अद्याप प्रलंबित असला तरी तो अल्पावधीत सुटण्याची शक्यता आहे. डंम्पिंग ग्राऊंडसंदर्भात प्रशासन सतत प्रयत्नशील असले तरी या कामासाठी नियुक्त करण्यात येणारे ठेकेदार कचरा निर्मूलनाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून जात असल्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.१४ जुन रोजी होणाऱ्या या निवडणुकीचा प्रचार १२ जूनला संध्याकाळी ५ वा. थांबणार आहे. २ ते १२ जुन दरम्यान होणाऱ्या या प्रचारासाठी प्रत्येक पक्षाला केवळ १० दिवस मिळत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धावपळ होणार आहे. एवढ्या कमी अवधीत त्यांना गाठण्याचे मोठे आव्हान प्रत्येक पक्षासमोर उभे ठाकले आहे. राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते जाहीर सभांसाठी वसई विरारमध्ये दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराची पुर्ण धुरा आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, माजी खा. बळीराम जाधव, आ. विलास तरे, महापौर नारायण मानकर व पक्षाचे दिग्गज नेते हे सांभाळणार आहेत. सेना व भाजपा युती झाल्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा प्रचार एकत्रितपणे होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये आघाडी झाल्यास त्यांचाही प्रचार एकत्रितपणे होईल असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)४वसई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ४८ हा नालासोपारा पुर्व भागात असून या प्रभागात वाहतुक कोंडी, शहर स्वच्छता, दर पावसाळ्यात परिसर जलमय होणे अशा महत्वाच्या ३ समस्यांना नागरीकांना तोंड द्यावे लागत असते. या भागातील गटारसफाईकडे दरवर्षी दुर्लक्ष होत गेल्यामुळे पावसाळ्यामध्ये हा संपुर्ण परिसर पाण्याखाली जातो व दोन ते तीन दिवस नागरीकांना हालअपेष्ठांना सामोरे जावे लागते. तुळींज येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली दरवर्षी या परिसराला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे व्यापारीवर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हा प्रभाग यंदा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. विजयनगर, गजानननगर, तुळींजपार्क व राधानगर परिसर इ. चा याप्रभागात समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या ९ हजार ८४५ इतकी असून त्यापैकी साडेसहा हजार मतदार आहेत. येथे बहुजन विकास आघाडी व सेना भाजपा युती यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र. ४९ हा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असून विजयनगर, भास्कर कॉम्प्लेक्स व अन्य नागरी वसाहतीचा समावेश आहे. ४या भागात गेल्या ५ वर्षात अपेक्षीत विकासकामे होऊ शकली नाहीत. नव्याने बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली पण नागरीसुविधांमध्ये मात्र वाढ होऊ शकली नाही. या प्रभागाची लोकसंख्या ११ हजार १४८ इतकी असून मतदार मात्र ७ हजाराच्या घरात आहेत. प्रभाग क्र. ५० मध्ये गायत्री मंदिर परिसर, एकता नगर व सुंदरनगर इ. परिसराचा समावेश आहे. या प्रभागात अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. महानगरपालिकेच्या दुर्लक्ष पणापायी येथे अनधिकृत बांधकामांना सतत खतपाणी पडले. त्यामुळे नागरीसुविधांवर प्रचंड परिणाम जाणवला. ४येथील लोकसंख्या ११ हजार २८९ च्या घरात असून हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागातही बहुजन विकास आघाडीसमोर सेना-भाजपा युतीचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत यासर्व प्रभागांवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले. या दोन पक्षाव्यतिरीक्त अन्य पक्षांची ताकद नगण्य असल्यामुळे उर्वरीत सर्व पक्षाच्या उमेदवारांना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे.