Join us

वाहतूककोंडीची समस्या वाढणार

By admin | Updated: July 15, 2014 23:57 IST

तीनहात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणानंतर आता येत्या काही दिवसांत

अजित मांडके, ठाणेतीनहात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणानंतर आता येत्या काही दिवसांत यातील पहिल्या टप्प्यातील प्रयोग तीनहात नाक्यावर अवलंबीला जाणार आहे. परंतु या प्रयोगामुळे वाहतूककोंडी सुटणार नसून उलट, वाहनचालकांचा वेळ, पैसा आणि इंधनामध्ये वाढ होणार आहे. या प्रयोगामुळे हायवेवरून सर्व्हिस रोडला आणि सर्व्हिस रोडवरून हायवेला जायचे झाल्यास वळसा घालूनच जावे लागणार असल्याने पालिकेचा हा प्रयोग कितपत यशस्वी होणार याबाबत आतापासूनच शंका निर्माण झाल्या आहेत. ठाणे महापालिकेने या तीन जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून येथील वाहतूककोंडीचा सर्व्हे केला होता. त्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करता येऊ शकतात याचा अभ्यास या संस्थेने केला असून, नुकतेच याचे सादरीकरण महापालिका आयुक्तांसमोर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिला प्रयोग तीनहात नाका जंक्शनवर केला जाणार आहे. सध्या येथे सात सिग्नल असून, १९० सेकंदाच्या कालावधीचा सिग्नल आहे. परंतु आता येथे पाचच सिग्नल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सिग्नल जरी पाच होणार असले तरी वेळेत कोणताही बदल सुचविण्यात आला नसून वाढ करण्याचेच निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरटीओकडून येणारा सर्व्हिस रोड आणि गुरुद्वाराकडून येणारा सर्व्हिस रोड हा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर उर्वरित सर्व्हिस रोड हे १०० मीटरवर आधीच वळविण्यात येणार असून, ते हायवेला जोडण्याचा मानस आहे. परंतु, वाहतूक पोलिसांनी हरकत घेतल्याने गुरुद्वाराकडील सर्व्हिस रोड हा खुला राहणार आहे. परंतु आरटीओकडील सर्व्हिस रोड हा बंद राहणार आहे.