मुंबई : भारतातील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास उंचावला असून धोरण सुधारणेमुळे देशातील स्थावर मालमत्ता उद्योग क्षेत्रात सध्या सकारात्मक वातावरण आहे, असा निष्कर्ष गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे.सीबीआरई साऊथ आशिया प्रा. लि. या रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने गुरुवारी ‘आशिया पॅसिफिक रिअल इस्टेट मार्केट आऊटलूक २०१७’ हा अहवाल प्रसिद्ध केला. निवासी बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी २०१६ मध्ये भारत शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे २०१७ मध्ये या क्षेत्रात स्थिर वाढ होत असून, या क्षेत्राला स्थैर्य आणि नवी झळाळी मिळाली आहे, असे मत या वेळी सीबीआरईचे भारत व आग्नेय आशियाचे अध्यक्ष अंशुमन मॅगझिन यांनी व्यक्त केले. शहरांतील गृहविक्रीमध्ये २०१७ च्या पहिल्या तिमाहीत ७० टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ च्या चौथ्या तिमाहीत १४ हजार घरांची विक्री झाली होती. २०१७ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल २३ हजार यूनिट्सची विक्री झाली आहे. चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या शहरांत सर्वाधिक यूनिट्सची विक्री झाली आहे. किफायतशीर घरे बांधण्याकडे खासगी विकासकांचा कल असून त्यामुळेच या क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
बांधकाम क्षेत्रासाठी यंदा सकारात्मक वातावरण
By admin | Updated: April 28, 2017 01:39 IST