Join us

प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयोगशाळाच व्हेंटिलेटरवर

By admin | Updated: July 6, 2015 23:33 IST

प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयोगशाळाच व्हेंटिलेटरवर

प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयोगशाळाच व्हेंटिलेटरवर
खार येथील प्रयोगशाळा मोडकळीस
वरळीची प्रयोगशाळा बंद पडली

मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील औद्योगिक व ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे़ मात्र प्रदूषणावर संशोधन व सर्वेक्षण करण्यासाठी असलेली पालिकेची खार येथील प्रयोगशाळा मोडकळीस आली आहे़ वरळी येथील प्रयोगशाळा कर्मचारी नसल्याने बंद पडली आहे़ तर पालिकेच्या नवीन प्रयोगशाळेच्या ठिकाणी संगणक नसल्याने अचूक निष्कर्ष येण्यास अडचण येत आहे़ त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे़
माजी महापौर डॉ़ शुभा राऊळ यांनी ६६ ब अन्वये या गंभीर विषयाकडे पालिका महासभेचे आज लक्ष वेधले़ मुंबईत वाढत्या जल, वायू व ध्वनी प्रदूषणाने आव्हान उभे केले आहे़ परंतू प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रे जागेअभावी पडून आहेत़ पर्यावरण विभागात कर्मचारी नसल्याने शांतता प्रवण क्षेत्र, छोट्या कंपन्या व मोठे उद्योगधंदे यांचे वर्गीकरण करण्याची कामे रखडली आहेत़ त्यामुळे या विभागाचे कामकाजच ठप्प पडल्याचे चित्र आहे, असे डॉ़ राऊळ यांनी निदर्शनास आणले़
पंतप्रधानांनी देशाच्या आरोग्यासाठी योगा डे साजरा केला़ परंतु देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यावरण प्रयोगशाळेची ही अवस्था असल्याचे महापौरांनी त्यांना पत्राद्वारे कळवावे, अशी सूचना समाजवादीचे याकूब मेमन यांनी केली़ पूर्व उपनगरातील औद्योगिक व रसायनिक कारखान्यांमुळे महिलांचा गर्भपात व दम्याचा विकार वाढला आहे़ तरीही अशा कारखान्यांवर कारवाई होत नाही, असा संताप मनसेचे दिलीप लांडे व सभागृह नेते तृष्णा विश्वासराव यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
...............................
(पॉइंटर)
* हवेत वाढत असलेल्या शिशाचे प्रमाण मोजण्यासाठीचे यंत्र जागेअभावी पडून आहे़
* २०११-२०१२ मध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता़
*या अहवालानुसार मुंबईत दहा टक्क्यांहून अधिक लोकांना दम्याचा त्रास आहे़
* केंद्र व राज्य सरकार व महापालिकेने एकत्रित येऊन राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण केंद्र स्थापन करण्याची मागणी़
........................................
(चौकट)
प्रशासन हतबल
यापूर्वीही डॉ़ राऊळ यांनी अनेकवेळा पर्यावरण विभागाच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे़ परंतु प्रयोगशाळा लवकरच अद्ययावत करण्याच्या आश्वासनांवर त्यांची बोळवण केली जात आहे़ त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी पालिका महासभेत आज प्रशासनाला फैलावर घेतले़ मात्र प्रदूषण पसरविणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकारच आपल्याकडे नसल्याची हतबलता अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी व्यक्त केली़
........................................
प्रदूषणावर नियंत्रणासाठी विशेष बैठक
अशा अनेक चर्चा सभागृहात होऊनही प्रशासन त्याची दखल घेत नाही़ त्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली़ परंतु सभा तहकूब करण्याऐवजी या विषयावर विशेष बैठक बोलावून तोडगा काढू, अशी भूमिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी घेतल्यामुळे ही चर्चा तेथेच थांबविण्यात आली़
.................................................