पालघर : येथील गिरनोली भागातून जनावरांची चोरी करून पळून जाणाऱ्या चार आरोपींना जागृत नागरिकांनी पकडून पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पालघरमधील रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याचा फायदा घेत भिवंडी, मुंब्रा, मुंबई भागांतील गायी, म्हशी चोरणाऱ्या टोळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत. जनावरे चोरट्यांना विरोध करणाऱ्या नागरिकांवर या चोरट्यांकडून जीवघेणे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. पालघर नगर परिषदेकडेही कोंडवाड्यांची व्यवस्था नसल्याने या मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे वाढत्या जनावरांच्या संख्येचा फायदा घेऊन सफाळे भागातून जनावरे चोरणाऱ्या टोळीला सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, काल गिरनोली भागातून टेम्पोद्वारे जनावरे चोरून पळणाऱ्या आरोपींना ग्रामस्थ गणेश पाटील, अरुण पाटील, रघुनाथ पाटील, भूपेश पाटील, पद्माकर पाटील, भगवान घरत इत्यादींनी पकडून पालघर पोलिसांच्या हवाली केले. पालघर पोलीस ठाण्यात मिनाज आम्बारे, चेतन खेडकर, सैफ कुरेशी, साजीद इ. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. (वार्ताहर)
जनावरे चोरणारी चौकडी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: September 15, 2014 01:19 IST