अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात चारचाकी, हलकी वाहने, व दुचाकी वाहनांच्या नोंदणीचे प्रमाण वर्षाकाठी ६ हजार असल्याची माहिती डोंबिवली शहर वाहतूक विभागातील अधिका-यांनी दिली. एवढेच नव्हे तर कल्याण परिवहन क्षेत्रात सर्वप्रकारच्या तब्बल ३ लाख वाहनांची नोंदणी झाली असल्याचेही सांगण्यात आले. दिवसेंदिवस शहरीकरण वाढत असल्याने प्रत्येकालाच वाहन सुविधा आवश्यकता वाटू लागली आहे. मात्र त्या प्रमाणात रस्ते मुबलक उपलब्ध नसल्याने वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत असल्याने पोलिसांनी यावर ‘सप्तसूत्री’ चा मार्ग शोधला आहे.केवळ डोंबिवली शहराचा विचार केल्यास शहरातील रस्ते अरुंद असल्याने शहरात सकाळी व संध्याकाळी सर्वच हमरस्त्यांसह ठिकठिकाणी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालक आणि परिणामी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी-कर्मचारी सर्वच त्रस्त असल्याचे निदर्शनास येते. त्यातच रस्त्यावरील होणारे अपघात,वाहतूककोंडी, त्यातून वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी वाहने चालवितांना तसेच पार्क करतांना ‘वाहतूक सप्तसूत्री’चे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने केले. या ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा अपघातामध्ये तब्बल ६७ ने घट झाली असून गतवर्षी १६७ होते तर यंदा केवळ १०० घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची सप्तसूत्री
By admin | Updated: January 16, 2015 22:53 IST