Join us

विसर्जन मिरवणुकीला पोलिसांची मदत

By admin | Updated: September 25, 2015 02:34 IST

गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीस येणारे अडथळे, चक्काजाम झालेले रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन या सर्वाची जबाबदारी एकट्या वाहतूक पोलिसांना पार पाडणे कठीण असते.

प्राची सोनवणे, नवी मुंबईगणेशोत्सवादरम्यान वाहतुकीस येणारे अडथळे, चक्काजाम झालेले रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन या सर्वाची जबाबदारी एकट्या वाहतूक पोलिसांना पार पाडणे कठीण असते. याच गोष्टीची जाणीव ठेवून वाशीतील राजीव गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत केली. या सर्वच विद्यार्थ्यांना नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वाशी विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीस अडथळे निर्माण करणाऱ्या गर्दीवर कसे नियंत्रण करावे याविषयी प्रशिक्षण देण्यात आले होते. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने या विद्यार्थ्यांना टोपी, टी-शर्ट आणि शिटी देण्यात आली होती. पोलीस मित्र या उपक्र मांतर्गत या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकी, रहदारीचे रस्ते, विसर्जन स्थळे अशा सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांना सर्वतोपरी मदत केली. विसर्जनानंतर निर्माल्य व केरकचऱ्यामुळे तलावांचे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी वाशी येथील राजीव गांधी महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन तिथल्या परिसराची स्वच्छता केली. अवघ्या काही तासातच या तरु णांनी संपूर्ण परिसराला नवी झळाळी आणली. ‘मुनीजन’ स्वच्छ भारत अभियानांतर्गत या विद्यार्थ्यांनी वाशीतील विसर्जन स्थळांची स्वच्छता केली. मुलांबरोबरच मुली देखील या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अवघ्या काही तासातच या विद्यार्थ्यांनी वाशीतील सागर विहार या परिसराची स्वच्छता केली. याचबरोबर विसर्जनस्थळांवर या विद्यार्थ्यांनी जलप्रदूषणाबाबत जनजागृती करु न भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. राजीव गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) स्वयंसेवकच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी विसर्जन स्थळे स्वच्छ करून वाशी परिसरात स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली. विसर्जनानंतर तलावात साचलेला गाळ, केरकचरा याची विल्हेवाट लावण्यात आली.