इंदुमती गणेश - कोल्हापूर , कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेला उज्ज्वल इतिहास आहे, जो काळाच्या ओघात संपत चालला आहे. त्याला सावरण्याचा एकमेव पर्याय असलेल्या चित्रनगरीकडे शासन गांभीर्याने पाहायला तयार नाही. महामंडळाच्या राजकारणातून डोके वर काढायला सभासदांना वेळ नाही, तर जनतेला चित्रनगरी शासनाने बंद केली नाही यातच समाधान आहे. ही परिस्थिती पाहता चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाची अपेक्षा धरणे म्हणजे या क्षणी तरी मृगजळच ठरले आहे. कोल्हापूरची चित्रपट परंपरा टिकविण्यासाठी चित्रपट व्यावसायिकांनी चित्रनगरी ही संस्था स्थापून, त्यासाठी मोठी चळवळ उभारली होती. १९८४ ला मोरेवाडी येथील ७५ एकरांच्या विस्तीर्ण जागेत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते कोनशिला समारंभ झाला; पण स्थापना झाल्यापासूनच चित्रनगरीला दुर्दैवाच्या कळा सुरू झाल्या. शासनाने चित्रनगरीकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. उलट तोट्यात चालली म्हणून ती बंद करण्याचा प्रयत्न केला, तो कोल्हापूरकरांनी हाणून पाडला. अखेर २००४ ला चित्रनगरीच्या विकासाची घोषणा करण्यात आली. चित्रपट महामंडळाचे दिवंगत अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या काळात २००९ मध्ये चित्रनगरीचा विकास आराखडा बनविण्यात आला होता. त्या आराखड्यात त्रुटी काढल्यानंतर दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाहणी दरम्यान मिटकॉनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. त्यांनी पाहणी करून आराखड्यात अपेक्षित बदल करून हा आराखडा शासनाकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर येथे काहीच हालचाल झाली नाही. चित्रनगरीचा सगळा कारभार मुंबईतून चालविला जातो. निधी किंवा प्रशासकीय सर्व निर्णय मुंबईतूनच होतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर चित्रपट महामंडळही या कामाबद्दल अनभिज्ञ असते. कोल्हापूरचेच असलेले चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील हे काही स्पष्टपणे याबाबत माहितीही देत नाहीत. वारंवार फोन केला तर तो एक तरी बंद असतो किंवा ते उचलतच नाहीत. उचललाच तर बिझी असल्याने आपण नंतर बोलूया, असे सांगतात. त्यामुळे चित्रनगरीच्या बाबतीत नक्की शासनाने काय धोरण अवलंबले आहे हे कळायला मार्ग नाही. मात्र, या साऱ्या कारभारात चित्रनगरी अस्तित्वहीन होत आहे हे मात्र नक्की!गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली, अशी एक म्हण आहे. कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाच्या गाजराची पुंगीही वाजेना असे भासवून, ती मोडून खाण्याचाच प्रकार शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. चित्रनगरी पुनरुज्जीवनाच्या घोषणेला दहा वर्षे लोटली आहेत. या वर्षागणिक चित्रनगरीच्या विकासाचे स्वप्न धूसर होत आहे. विकासाच्या नुसत्याच घोषणा व समित्यांची पाहणी आता या चित्रनगरीला नवी राहिलेली नाही. त्यामुळे पडझडीला आलेल्या इमारतींनीही आता अस्तित्वाची आस सोडली आहे. एरवी आंदोलने करणारे कोल्हापूर मात्र शहराचा सांस्कृतिक ठेवा परत मिळविण्यासाठी रस्त्यावर येत नाहीत, चित्रपट महामंडळ त्यासाठी जोर लावत नाही, हेच या शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल.नवा आराखडा४चित्रनगरीसंदर्भात विचारणा केली असता व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी नव्याने आराखडा तयार करण्यात आला असून, तो अत्यंत सुसज्ज असल्याचे चार महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र, या आराखड्यात नक्की काय आहे, त्यात कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे, आराखडा किती कोटींचा आहे, त्याला मंजुरी मिळाली का़? प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याबद्दल काहीच सांगितले जात नाही. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीला चित्रनगरीबद्दल काही विचारले की, ते आम्हाला काहीच माहीत नाही, असे सांगतात. २२ कोटी गेले कुठे ?४तीन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात दहा कोटींचा निधी चित्रनगरीसाठी जाहीर केला होता. नंतर आणखी १२ कोटी अशी एकूण २२ कोटींची तरतूद चित्रनगरीसाठी करण्यात आली. त्यातील तीन कोटी रुपये कंपाउंडच्या बांधणीसाठी खर्च झाले; मात्र त्यानंतर नव्या लोकेशनच्या उभारणीसाठीची एक वीटही या परिसरात चढविण्यात आलेली नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाचा विकास सुरूझाला. महालक्ष्मीची निदान चर्चा तरी सुरू आहे, महापालिका त्यासाठी प्रयत्न करीत आहे; पण चित्रनगरीचा विकास मात्र कुठेच दृष्टिक्षेपात येत नाही.बेलगाम वर्तणूक४एकीकडे शासनच चित्रनगरी संपण्याची वाट बघत असताना दुसरीकडे चित्रपट महामंडळाचे सभासद एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात मग्न आहेत. महामंडळाच्या कामकाजावरून दारात उपोषणाला बसणारे, पै न् पैचा हिशेब मागणारे, संचालकांची नावे डिजिटलवर झळकविणारे आणि महामंडळाचा फार पुळका असल्याचा आव आणत सभा उधळून लावणाऱ्या विरोधकांनी शासनाला कधी या दिरंगाईचा जाब विचारलेला नाही.४उलट या बेलगाम वर्तणुकीने ४५ वर्षे अस्मिता जपलेल्या चित्रपट महामंडळाच्या नावाला बट्टा लावला आहे. या राजकारणाने आता काम करणाऱ्या माणसाचे चारित्र्यहनन करण्याच्या कारस्थानापर्यंतचा तळ गाठला आहे, तर विद्यमान अध्यक्ष या वर्तणुकीला आळा घालण्यात अपयशी ठरले. ‘आमच्या हयातीत तरी चित्रनगरी विकसित होऊ दे’ ४चित्रनगरी स्थापनेत त्याकाळी ज्या तरुणांनी यात सहभाग घेतला, ते आता वृद्ध झाले आहेत. कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाचा उज्ज्वल इतिहास, चित्रनगरीचा ऱ्हास आणि वर्तमानात कोल्हापूरच्या या चित्रपटसृष्टीच्या झालेल्या दुर्दशेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ चित्रपट व्यावसायिक हेआमच्या हयातीत तरी चित्रनगरीचे काम सुरू होऊ दे, अशी अपेक्षा व्यक्त करतात; पण आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काही दिवसांत आचारसंहिताही लागेल. त्यामुळे मंत्रालयात नवे सरकार निवडून आल्याशिवाय चित्रनगरीच्या विकासावर चर्चा करणे व्यर्थ आहे.
चित्रनगरीचा ‘डर्टी पिक्चर’!
By admin | Updated: August 5, 2014 00:11 IST