Join us  

फेरीवाला मराठी! मग रस्त्यावरून चालणारा कोण? चालणारा माणूस मराठी नाही का? राज ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 6:41 PM

मुंबईतील फेरिवाल्यांना हटविण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.

मुंबई : मुंबईतील फेरिवाल्यांना हटविण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. बेकायदा फेरिवाल्यांवर तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची आमची मागणी आहे. फेरीवाल्यांमध्ये मराठी माणूस असल्याचे बोलले जाते. मग रस्त्यांवरून चालणारा माणूस मराठी नसतो काय? असा सवालही त्यांनी या भेटीदरम्यान विचारला.एल्फिस्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंरीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी संतप्त मोर्चा काढला होता. या दुर्घटनेसाठी अरूंद पुला इतकेच पादचारी पुलांवर ठाण मांडणारे फेरिवालाही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पदपथ, पूल, रस्ते फेरिवालामुक्त करण्यासाठी त्यांनी महापालिकेला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीप्रमाणे पालिका फेरिवाल्यांवर काय कारवाई करीत आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना अनेकवेळा रेल्वे आणि महापालिकेत हद्दीचा वाद निर्माण होतो. यासाठी आयुक्तांनी रेल्वे महाव्यवस्थापकांबरोबर बैठक घेऊन हद्दीचा वाद सोडवावा अशी सुचनाही त्यांनी केली. यावर दोन्ही प्राधिकरणांची हद्द ठरवून महापालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर कारवाई करू अशी हमी आयुक्तांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तांकडे मांडलेली संकल्पना रेल्वेच्या महाव्यवस्थपकांकडेही मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसहभाग हवाफेरिवाल्यांचा रोजगार जावा यासाठी ही मागणी नाही. मात्र करदात्याला रस्त्यांवरून चालता यावे, यासाठी हा लढा आहे. या करदात्यांमध्ये मराठी माणूसही आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसतात म्हणून लोकं त्यांच्याकडून वस्तू खरेदी करतात. पण फेरीवाले रस्त्यांवर बसलेच नाही, तर हेच लोक बाजारात जाऊन खरेदी करतील. या मोहिमेत नागरिकांचाही तेवढाच सहभाग आणि जागरूकता अपेक्षित असल्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रारफेरीवाल्यांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्याची मागणी  राज ठाकरे यांनी केली. ही मागणी आयुक्तांनी मान्य केली, असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित कारवाई करामहापालिकेच्या कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा त्याच जागी येऊन बसतात. त्यांच्यावर सतत कारवाई केल्यास मुंबई फेरीवालामुक्त करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :राज ठाकरे