Join us  

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी, ममतांना जनताच नमविणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:06 PM

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सारीच मूल्ये पायदळी तुडवली जात असून, जेव्हा सार्‍या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते.

मुंबई- पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सारीच मूल्ये पायदळी तुडवली जात असून, जेव्हा सार्‍या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता तेथील जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रोडशो दरम्यान वाहनांवर लाठ्या फेकण्यात आल्या आणि त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र निषेध केला आहे.निवडणुकीच्या प्रारंभीपासूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या वाढत्या जनाधाराचा धसका घेतला असून, भाजपा नेत्यांना जाणुनबुजून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मनाई करण्यात येत आहे. नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारली जात असून, जणू हे राज्य म्हणजे केवळ ममतांची मालकी असे समजून राज्य कारभार हाकला जात आहे. अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत. तृणमूल कार्यकर्त्यांच्या दहशतीत झालेले मतदानाचे प्रकार तर विविध माध्यमांनीच दाखविले. राज्य सरकारची संपूर्ण शक्ती पणाला लावून ही निवडणूक लढविताना ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.आज तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो अतिशय शांतपणे होत असताना त्यांच्या ट्रकवर लाठ्या फेकण्यात आल्या आणि तृणमूलचे कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांवर चालून गेले. या निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार हा पश्चिम बंगालमध्येच झाला. त्यामुळे ममता बॅनर्जींनी पराभवाचा किती धसका घेतला, हे स्पष्ट होते. या निवडणुकीत ममतांना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तेथील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस