पनवेल : अहमदनगरमधील पी. डी. नटवरलाल कुरियर कंपनीमधून २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन मुंबईकडे जाणा-या कर्मचा-याला सात ते आठ जणांच्या टोळीने येथील बोगद्याजवळ लुटले होते. जूनमध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात नवीन पनवेल पोलिसांना यश आले आहे. या कर्मचाऱ्याला लुटण्यासाठी हे आरोपी रायगडमधील श्रीवर्धन येथून थेट पुण्याकडे रवाना झाले होते. त्यानंतर पुण्यावरुन थेट अहमदनगर गाठत या आरोपी त्याच ठिकाणी लॉजवर थांबले. यासाठी आरोपींनी भाड्याने इनोव्हा कार घेतली होती. पी. डी. नटवरलाल या कुरियर कंपनीमधील कर्मचारी ज्या गाडीने प्रवास करणार होता तीच गाडी या आरोपींनी निवडली. गाडी पुणे-मुंबई मार्गावरील भातान बोगद्याजवळ आल्यानंतर कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत खाली उतरविले. आरोपींच्या हातात पिस्तूल पाहून प्रवाशांनी देखील आरोपींना कोणताही विरोध केला नाही. यावेळी बसमधून खाली उतरताच आरोपींनी २५ लाखांची रक्कम घेऊन त्याठिकाणाहून पोबारा केला. घटनेची नोंद नवीन पनवेल पोलीस ठाण्यात केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक मिलिंद हिवाळी, प्रविण खानापुरे यांनी तपास करुन या गुन्ह्यातील सहा आरोपींना श्रीवर्धन येथून अटक केली. फोन टॅप केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. या आरोपीमध्ये विराज नलावडे ( वय २७), हुसेन वस्ता (वय३०) , रियाज दिवेकर ( वय २७ ), इमरान शेख ( २४) , कौशिक पटेल ( वय ३०), सलमान दिवेकर ( वय २३) आदींचा समावेश आहे. मुख्य आरोपी मात्र फरारी असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . (प्रतिनिधी)
प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक
By admin | Updated: February 12, 2015 01:02 IST