नवी मुंबई : बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाशी परिसरातील प्रवासी त्रस्त झाले आहेत. भाडे नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व आरटीओ अधिकार्यांचा धाक उरला नसून त्यांच्यासमोरच वाहतूक नियम धाब्यावर बसविले जात आहेत. वाशी परिसरातील रिक्षा व्यवसायाविषयीची समस्या हाताबाहेर जावू लागली आहे. रेल्वे स्टेशनसमोर सिडकोने सुसज्ज रिक्षा स्टँड तयार केले आहे. शेअर व मीटरसाठी स्वतंत्र लेन तयार केली आहे. अनेक प्रामाणिक रिक्षा चालक या लेनचा वापर करतात. परंतु ठरावीक चालक नियम तोडून रोडवर वाहने उभी करत आहेत. यामुळे येथे चक्का जाम होवू लागला आहे. येथे पोलिसांसाठी स्वतंत्र चौकी आहे. परंतु पोलीस असले तरी रोडवर रिक्षा उभ्या असतात. पोलीस त्यांच्या सवडीप्रमाणे कारवाई करतात. कारवाई करताना शिस्त लावण्यापेक्षा दंड वसुलीवर भर दिला जातो. यामुळे कारवाईचा आकडा वाढतो परंतु शिस्त मात्र लागत नाही. पोलिसांचा धाक आता उरला नसून नागरिकही त्यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत. वाशी परिसरात भाडे नाकारण्याचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले आहे. सेक्टर २, १७, वाशी डेपो व इतर स्टँडवरून सानपाडा हायवे व इतर ठिकाणी जायचे असेल तर नकारघंटा ऐकावी लागत आहे. नेरूळला जायचे असेल तर दिवसाही हाफरिटर्न द्यावे लागत आहे. वृद्ध, आजारी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सोयीचे असेल तरच भाडे घेतले जात आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रिक्षा चालकांना पोलीस व आरटीओ दोन्ही यंत्रणांचा धाक उरला नाही. यामुळे प्रवाशांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवासी त्रस्त
By admin | Updated: May 22, 2014 03:36 IST