Join us  

परप्रांतीयांनी मुंबईच्या वैभवात भर घातली - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:03 AM

उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणा-या लोकांनी  महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत घाटकोपर स्टेशन रोडवर शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाच्या नामकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

मुंबई - उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणा-या लोकांनी  महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतीयांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले, मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी  केले. 

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे भाषिक अस्मितेचे राजकारण करणा-या पक्षांच्या हाती आयते कोलीत सापडणार आहे. मुंबईत घाटकोपर स्टेशन रोडवर शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाच्या नामकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

उत्तर भारतीय आणि परप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला. भाषा वादाचा विषय असू शकत नाही. भाषा संपर्काचं माध्यम असून भाषा माणसाला जोडते. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद निर्माण करु नये असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत रहाणारे उत्तर भारतीय मराठी संस्कृतीशी एकरुप झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

आणखी वाचा - मुंबई- महाराष्ट्र आधीपासूनच महान, परप्रांतीयांची गरज नाही, मनसेचं मुख्यमंत्र्यांना उत्तर

उत्तर भारतीयांना लक्ष्य करणा-यांविरोधात आम्ही तक्रार दाखल होण्याआधीच कारवाई करत आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह यांच्या कार्याचा गौरव केला. हिंदी हायस्कूलच्या बैजनाथ साबू सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह हे नेते उपस्थित होते.                                                                    

टॅग्स :देवेंद्र फडणवीस