मुंबई : भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही, आणि अशा वेळी समलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे़ या जाहिरातीत दोन मुलींच्या अंतर्गत संबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यात दोन मुली एकमेकांवर प्रेम व्यक्त करीत आहेत. या जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असले तरी एलजीबीटी समुदायासाठी आणि समुदायातील तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी या जाहिरातीचे स्वागत केले असून, एलजीबीटी समुदाय मुख्य प्रवाहाचाच भाग असल्याचे मत मांडले आहे.याविषयी एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या ‘हमसफर’च्या डॉ. अल्पना डांगे म्हणाल्या, की गेली अनेक वर्षे एलजीबीटी समुदायाच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा सुरू आहे. परंतु हा विचारांचा लढा असल्याने अजून बरीच वर्षे विचारप्रबोधन होण्यास जातील. मात्र यातील सकारात्मक भाग असा की सध्या सोशल मीडियाचे माध्यम अधिक सशक्त असल्याने एलजीबीटी समुदायाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. ज्या प्रकारे स्त्री-पुरुष वर्गाचा विचार करून जाहिराती बनविल्या जातात, त्याप्रमाणे एलजीबीटी समुदायाचा विचारही सर्व बाबतीत केला पाहिजे. या जाहिरातीमुळे अशा प्रकारचा विचार समाजात रुजण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्राने जाहिराती तयार करताना या समुदायातील ग्राहक वर्गाचा विचार केला पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या जाहिराती वाहिन्यांच्या माध्यमातून समोर आल्यास अधिक परिणामकारक ठरतील, असे समपाथिक ट्रस्टचे संचालक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले.लेस्बियन कपलची जाहिरात व्हायरल होणे हा खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाप्रकारे एलजीबीटी समुदायाची मेट्रीमोनिअल जाहिरात वृत्तपत्रात छापून आली होती. त्यामुळे या घटना समाजातील विचार प्रबोधनाची नांदी आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे भविष्यात एलजीबीटी समुदाय मुख्य प्रवाहाचा भाग होऊन समांतर स्थान मिळवेल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही, असे ‘हमसफर’ ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते पल्लव पाटणकर यांनी सांगितले. एलजीबीटी समुदायाचे कार्यकर्ते अशोक राव कवी यांचे असे म्हणणे आहे की, लेस्बियन्स जोडपीही आता सोबत राहत आहेत. तसेच ते अधिकारांची लढाईही लढत आहेत.एलजीबीटी समुदायाविषयी भारतातील तरुणाईच्या विचारात बदल घडविण्यासाठी सोशल मीडिया हा परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे भविष्यात याच माध्यमातून समाजातील या समुदायाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबविणार आहोत. या जाहिरातील ‘त्या’ कपलमध्ये दाखविलेला संवाद, समाज, पालकांविषयीची भीती अतिशय उत्तम प्रकारे रेखाटले आहेत़ त्यामुळे एलजीबीटी या प्रयत्नांना निश्चितच दाद देत असल्याचे एलजीबीटी ‘यारीया’ उपक्रमाच्या प्रमुख सोनल ग्यानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एलजीबीटी मुख्य प्रवाहाचाच भाग
By admin | Updated: June 15, 2015 05:40 IST