Join us  

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक; संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 7:01 AM

ऐन दिवाळीत एसटीच्या संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल

- विलास गावंडे   यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर हजर होण्याचा आदेश न्यायालयाने दिला असतानाही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. संपाची तीव्रता कमी होण्याऐवजी रविवारी वाढली. राज्यातील ११९ आगार या दिवशी बंद होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उद्रेकाचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. ऐनदिवाळीत गावी गेलेल्या नागरिकांचे एसटीच्या संपामुळे अतोनात हाल झाले.   

तब्बल १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाची धग वाढत चालली आहे. सुटीचा दिवस आणि दिवाळीचा काळ असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती; परंतु त्यांना बसफेऱ्या नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती या सर्व विभागांतील आगार बंदमुळे महामंडळाला मोठा फटका बसला.  

महामंडळाचे बजेट कोलमडले

हातावर आणून पानावर खाणे, असा महामंडळाचा उद्योग आहे. मात्र, मागील १२ दिवसांपासून उत्पन्नाचा आलेख अतिशय खाली आला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर दररोज १४ कोटी रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या एसटीचे उत्पन्न आता अर्ध्यावर आले आहे.

दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे रमेश टाळीकुटे (४१) या बस वाहकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हिंगोलीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड आगारातही अमोल कोकटवाड (३५) या एसटी चालकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे.   

प्रवाशाच्या कानशिलात लगावली! अकोला येथे ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी एकच गर्दी केली. मात्र, आंदोलक कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरविले. एका प्रवाशाला धक्काबुक्की केली, तर दुसऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकारही घडला. अमरावतीमधील आंदोलनाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी भेट दिली. एसटी कामगारांची होणारी थट्टा राज्य सरकारने थांबवावी; अन्यथा मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा यावेळी आमदार राणा यांनी दिला. 

पुन्हा कामबंद आंदोलन जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन केले. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात जळगाव आगाराच्या २०० फेऱ्या रद्द झाल्या. दुपारनंतर औरंगाबाद, धुळे, नाशिक व जिल्हाभरातील आगारातून एकही बस जळगाव आगारात आली नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

 

 

टॅग्स :एसटी संप