मुंबई : ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेमुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटू शकलो. आयुष्यात पाहिलेले ‘हवाई सफरीचे’ स्वप्न साकारण्यात ‘लोकमत’चा मोठा वाटा आहे. या अभिनव उपक्रमाबाबत मी ‘लोकमत’चा खूप आभारी आहे, असे उद्गार लोअर परळ येथील संकेत धामणकर या विद्यार्थ्याने काढले. ‘हवाई सफरी’बाबत संकेत म्हणाला, मी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात इयत्ता नववीत शिकतो. एके दिवशी शाळेत आम्हाला लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाबाबत सांगण्यात आले. त्यानंतर मी वडिलांना दररोज ‘लोकमत’ वृत्तपत्र घरी आणण्यास सांगितले. मी नित्यनियमाने त्यातील ‘ग्रीन किड्स’ हे पान वाचू लागलो. त्यामुळे माझ्या सामान्य ज्ञानातही भर पडली. त्याचमुळे मी ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेत सहभागी होऊ शकलो आणि मला ‘हवाई सफरी’चा रोमहर्षक अनुभव घेता आला. मुंबईतून माझी ‘हवाई सफरी’साठी निवड करण्यात आल्याने मी खूप खूश आहे. सकाळी साडेसहा वाजता निघून बसने आम्ही सांताक्रूझ विमानतळावर पोचलो. ८ वाजता विमानात बसलो, त्या वेळचा अनुभव शब्दांत मांडता न येण्यासारखाच आहे. मी खूपच एक्साइट झालो होतो, त्याबरोबर थोडी भीतीही वाटत होती. काही वेळातच आम्ही दिल्ली विमानतळावर पोचलो. दरम्यानच्या काळात विमानातून खाली पाहताना पोटात गोळा आला होता. इतक्या उंचावरून मुंबई पहिल्यांदाच पाहायला मिळत होती. एक क्षण तर मी स्वर्गातच आहे, असे वाटू लागले होते. विमानातून उतरल्यानंतर आम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी नेण्यात आले. तेथील चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही राजगड, महात्मा गांधी यांची समाधी, लाल किल्ला, इंडिया गेट आणि संसद भवन पाहिले.यानंतरचा प्रसंग तर कधीही न विसरण्यासारखा आहे. मी चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यांनी आमचे आपुलकीने स्वागत केले. त्यांनी चक्क मराठीतच ‘काय, कसे आहात सर्व?’ या शब्दांत आमची चौकशी केली. आम्हीही त्यांना ‘बरे आहोत. येथे ‘लोकमत’च्या सहकार्यामुळेच आलो’ असे त्यांना सांगितले. तुम्ही फार नशीबवान आहात, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आमचे कौतुक केले. तो क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी आहे. यानंतर रात्री ११ वाजता आम्ही मुंबईत परतलो. हे मौल्यवान क्षण स्मरणात राहतील. (प्रतिनिधी)
‘लोकमत’मुळेच मिळाली पंतप्रधानांना भेटण्याची संधी
By admin | Updated: July 15, 2014 01:03 IST