मुंबई : राज्यात नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत आलेल्या २९८ प्रस्तावांपैकी केवळ एकाच महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. शिवाय प्रस्ताव सादर केलेल्यांपैकी केवळ ४६ महाविद्यालयांना एलओआय (उद्देश पत्र) दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्याचे गलगली यांनी सांगितले.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने एलओआयसाठी ४६ महाविद्यालयांना परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्षात एकही नवीन महाविद्यालय सुरू झालेले नाही. याउलट २९८ महाविद्यालयांचे प्रस्ताव सरकारी परवानगीसाठी रखडले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे नवीन महाविद्यालय आणि अतिरिक्त तुकड्यांची माहिती मागवली असता ही माहिती समोर आली.विभागाचे कार्यासन अधिकारी रणजीत अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी १३० आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण १६८ प्रस्ताव आले होते. त्यातील २०१४-१५ शैक्षणिक वर्षासाठी आलेल्या प्रस्तावांत जळगाव विद्यापीठाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, ४६ प्रस्तावांना एलओआय देण्यात आला आहे; तर २०१५-१६ शैक्षणिक वर्षासाठी आलेल्या प्रस्तावांत एकाही महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली नसून सर्व प्रस्ताव विद्यापीठांना परत पाठविण्यात आले आहेत.
राज्यात दोन वर्षांत केवळ एका महाविद्यालयाला परवानगी!
By admin | Updated: September 1, 2015 01:35 IST