ठाणे : तब्बल एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेले मुंब्रा येथील इस्टेट एजंट खालीद कादरी (४९) यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट- १ आणि मुंब्रा पोलिसांच्या पथकाने पाटणा येथून सुटका करुन तिघा खंडणीबहाद्दरांना अटक केली. त्यांच्याकडून खंडणीतील ३० लाखांपैकी २९ लाख ८९ हजार रुपये रोकड, तीन मोबाईल आणि गुंगीचे औषध हस्तगत करण्यात आले. याच गुन्हयातील खंडणीबहाद्दरांचा आणि अपहरण केलेल्या एजंटचा असे आणखी दोन मोबाईल ठाणे पोलिसांनी पश्चिम चंपारण्य (बिहार) भागातून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नूर आलम (३०), सैफीउल्ला खान (४५) आणि इरफान खान (२२, रा. तिघेही कंगली, जिल्हा बेतीया, बिहार) या तिघांना बिहारमधून ११ आॅगस्ट रोजी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. खंडणी उकळण्यासाठी वापरलेला मोबाईल त्यांनी भारत नेपाळ सीमेवरील दंडक नदीच्या कॅनलमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी फेकला होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, हवालदार आनंदा भिलारे आणि शिवाजी गायकवाड यांच्या पथकाने १५ आॅगस्ट रोजी या कॅनलमधून नूर आलमचा मोबाईल शोधला तर त्याच्या एका मित्राच्या घरुन कादरी यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. खंडणी मागण्यासाठी याच मोबाईलचा त्यांनी उपयोग केल्याचे तपासात उघड झाले. एक कोटींची खंडणी मागून ३० लाखांची खंडणी कादरी यांच्या पत्नीकडून स्वीकारताना वरील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या जीवाला धोका होऊ न देता अपहरणकर्त्यांनी सांगितल्यानुसार बिहारमधील कंगली या गावातून पोलिसांनी मोठया कौशल्याने त्यांची सुटका केली. याप्रकरणी मुंब्रा आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एक कोटींची खंडणी; तिघांना अटक
By admin | Updated: August 18, 2016 02:16 IST